पाटणा : देशातील सहाव्या टप्प्यात आज मतदान होत असून आता मतदानाचा अंतिम व शेवटचा टप्पा 2 जून रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी आज बिहारमधील 40 जागांपैकी 8 जागांसाठी मतदान (voting) प्रक्रिया पूर्ण होत आहे. अंतिम टप्प्यात मतदान होत असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश व बिहार ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) या राज्यात जाहीर सभा घेत स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटलीपुत्रनंतर काराकाट येथे जाहीर सभा घेतली. येथील एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी मोदींची सभा पार पडली. 


मोदींनी बिहारमधून इंडिया आघाडी आणि आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये गरिंबाना लुटणारा कितीही मोठा शहंशाह असो, कितीही मोठा राजकुमार असो, त्याला तुरुंगात जावेच लागणार. तुरुंगातील भाकरी खावीच लागेल, ही एनडीए सरकार आणि मोदीची गॅरंटी आहे, असे मोदींनी म्हटले. 


नोकरीच्या बदल्यात जमीन देण्याच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मोदींनी बिहारमधून लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ज्यांनी गरिबांना लुटून नोकरीच्या बदल्यात जमीन लिहून घेतल्या. त्यांनी कान उघडे ठेऊन ऐकावं, आता त्यांचा तुरुंगात जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत मोदींनी थेट तुरुंगात जाणार असल्याचं म्हटलं आहे.हेलिकॉप्टरमध्ये चक्कर मारण्याचं पूर्ण होताच तुरुंगात जाण्याचा रस्ता निश्चित होईल. बिहारला लुटणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी थेट इशारा दिला आहे. 


4 जून रोजी संध्याकाळी इंडी आघाडीमध्ये फूट पडणार आहे. आरजेडीवाले म्हणतील की काँग्रेसने डुबवलं, हे एकमेकांचे कपडे फाडायचं सुरु करतील. तर काँग्रेसचं शाही कुटुंब पराभवाचा ठिपका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर ठेऊन विदेशात सुट्टी एन्जॉय करायला जाईल. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाऊन मल्लिकार्जुन खर्गे थकून जातीलस, असेही मोदींनी म्हटले. तसेच, आरजेडी, काँग्रे व इंडि आघाडीला देशाने अनेकवेळा नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, आज बिहारमध्ये लोकसभेच्या 8 जागांसाठी मतदान होत असून दुपारी 3 वाजेपर्यंत 45.21 टक्के मतदान झाले आहे. बिहारमधील मतदानाचा पहिला टप्पा 6 व्या तर दुसरा टप्पा 7 व्या शेवटच्या टप्प्यात पार पडणार आहे. 




हेही वाचा


पारा वाढला, उत्तर भारत तापला, देशातील 'हे' शहर ठरलं सर्वात उष्ण 


आमदार राकेश दौलताबाद यांचं निधन; मतदान सुरू असतानाच दु:खद घटना