Jayant Patil & Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांच्या शेलक्या टीकेवर जयंत पाटील पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, 'आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही'
Jayant Patil & Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर हे सातत्याने जयंत पाटील यांच्यावर जहरी आणि आक्रमक भाषेत टीका करत आहेत. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना समजही दिली होती.

Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या थराला जात टीका केली होती. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. यावरुन बराच गदारोळ झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीचंद पडळकर यांना समजही दिली होती. मात्र, त्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी भाषेत टीका सुरुच ठेवली होती. परंतु, या सगळ्याला जयंत पाटील यांनी एकदाही समोर येऊन प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे जयंत पाटील नेमके काय करत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला होता. या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.
वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. मी मागे एकदा म्हटलं होतं की, 'आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही.' जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर उपस्थित समर्थकांनी एकच जल्लोष केला.
गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली होती, असे मी समजतो. त्यामधून त्यांनी काय बोध घेतला मला माहिती नाही. माझ्याविरोधात सगळ्यांनी मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. याची चौकशी करा, त्याची चौकशी करा, असे अनेकजण बोलले. मला काहीही अडचण नाही. फक्त बोलू नका, माझी चौकशी कराच, असे सांगत जयंत पाटील यांनी दंड थोपटले. एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली, त्यानंतर या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मिळून सभा घेतली. भाजपमध्ये हा प्रकार मी कधी बघितला नव्हता. या सगळ्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे. हे सगळं जाणुनबुजून केले जात आहे, ही लोकांची खात्री आहे. निवडणुकीत याची प्रचिती येईल. या सगळ्याला लोकांनी मतपेटीतूनच उत्तर दिले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
NCP Sharad Pawar Camp: तुम्ही शांत का, जयंत पाटील म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्यापासून तुम्ही शांत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याविषयी जयंत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, मी प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघातील लोकांना भेटू शकत नव्हतो. माझा मतदारसंघातील जनसंपर्क बराच कमी झाला होता. पण आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नसल्याने आता मला लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटता येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा
जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर तारीख आणि वेळ सांग, मी वाळव्यात येतो; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले
























