![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
महाराष्ट्रातील परिस्थिती युपी-बिहारपेक्षा वाईट; सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जयंत पाटलांची जहरी टीका
Jayant Patil : मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदारांचे एकामागून एक कारनामे समोर येत असून, यावरूनच जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
![महाराष्ट्रातील परिस्थिती युपी-बिहारपेक्षा वाईट; सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जयंत पाटलांची जहरी टीका Jayant Patil criticism Ruling Party MLA Sunil Kamble Abdul Sattar Hemant Patil situation in Maharashtra is worse than UP Bihar Maharashtra politics marathi news महाराष्ट्रातील परिस्थिती युपी-बिहारपेक्षा वाईट; सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जयंत पाटलांची जहरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/e6a0b3e96286ad42a48b44acd6eb3e751704606297684737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा (Maharashtra) बिहार (Bihar) करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी-बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आज सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदारांचे एकामागून एक कारनामे समोर येत असून, यावरूनच जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की. "काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच काल मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांची एका बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ करणारा ऑडियो व्हायरल झाला. 'हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत!"असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठय़ा नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जावू दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलीस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पानउतारा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत हे महाराष्ट्र बघतोय! असं म्हणत त्यांनी निषेध केला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 7, 2024
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला…
अब्दुल सत्तारांचे दोन दिवसांत दोन प्रकरणे चर्चेत...
नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चे राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण दोन दिवसांत त्यांचे दोन प्रकरण समोर आले असून, त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि कार्यक्रम थांबवावा लागला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचले. त्यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याचे सूचना दिल्या. सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्या लोकांवर लाठीच्या सुरू केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली. दिसेल त्याला पोलीस लाठ्याने मारत होते. तर, दुसऱ्या प्रकरणात हिंगोली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात बैठकीतच वाद झाला आणि दोघांनी अश्लील भाषेत एकमेकांना सुनावल्याचे पाहायला मिळाले. याची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरूनच जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)