![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ, उदयनराजेंचा इशारा
वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं.
![थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ, उदयनराजेंचा इशारा Dont cut electricity of pending bill custemers, warns MP Udayan Raje थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ, उदयनराजेंचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/16/231706b6ac5f5a25afec9a6f869fd863_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : थकित वीज बिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी असा इशारा दिला आहे. उदयनराजेंनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. कोरोना महामारीत सामान्य जनतेचे हाल झाले आहेत. वीज कापली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. वीज बिल थकबाकीदारांच्या मी पाठीशी ठामपणे उभे राहणार आसल्याचेही पत्रकात उदयनराजेंनी म्हटलं आहे.
सध्या कोरोना महामारीने गेले वर्षभर ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व नागरीक त्रस्त आहे. लॉकडाउन,अनलॉक प्रकाराचा सकारात्मक/नकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. बहुतांशी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक आणि मुख्यत्वेकरुन शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत, विद्यमान आधुनिक काळात वीज जोडणी अत्यावश्यक आहे. अशी वीज जोडणी, वीजबिल थकबाकीमुळे तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीकडून केली जात आहे. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
दिल्ली सारख्या राज्यामध्ये वीजबिल काही युनिटपर्यंत पुर्णतः माफ आहे. तेथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खुप कमी आहेत. देशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही निश्चितच अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळात देखील वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा देखील सुरळीत राहिला. महाराष्ट्राची वीजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होत आहे ही वस्तुस्थिती
आहे. कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.
सध्या शहरी भागासह, ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरु आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात वीज कंपनीने, वीज बिलांचे सुद्ध वाटप केलेले नव्हते. सदरची तीन-चार महिन्यांची वीज बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना, कौटुंबिक आर्थिक नियोजन बारगळलेले आहे. तसेच एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट्सचा युनिट दर लागला गेल्याने, त्या युनिटसंख्येनुसार वीज दर आकारुन बीले दिली गेल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, थकीत वीज बिल टप्याटप्याने भरणेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा. किंवा याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहीजे. कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर वीज थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापी मान्य करता येणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजुने ठाम उभे राहणार आहोत. तसेच अशा कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेवून, त्याबाबतचा जागेवरच सोक्ष मोक्ष त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल गर्भित इशारा देखील उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)