Devendra Fadnavis: अनेकांना वाटलं माझी राख होईल पण प्रत्येकवेळी मी भरारी घेतलेय: देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील मराठा आंदोलन अवघड जाईल, असा अनेकांचा कयास होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कुशलतेने ही परिस्थिती हाताळली.

Devendra Fadnavis in Mumbai: राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे प्रतिपदान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली आहे. ही भरारी मी घेऊ शकलो कारण, मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेने सामना केला. राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येकवेळी सकारात्मकतेने पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे, हे बघण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो, असेही त्यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठे आंदोलन झाले होते. हजारो मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ते ही परिस्थिती कशी हाताळणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामार्फत मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईतून माघार घेतली होती. हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठे यश मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच राज्यातील प्रमुख मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांमध्ये 'देवाभाऊ' या नावाने जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरही ही जाहिरातबाजी करण्यात आली होती. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला न्याय मिळाल्याची बाब ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
























