Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
Ajit Pawar Politics : ज्या ठिकाणी मुस्लिम मतं आणि विरोधी मतं जास्त आहेत त्या ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात तर मविआ सक्षम असलेल्या ठिकाणी ते महायुतीत असल्याचं दिसतंय.

मुंबई : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या विरोधात लढतोय. यामागे विरोधकांची स्पेस काबीज करण्याची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या विरोधातील पुरोगामी विचारांची मतं एकगठ्ठा विरोधकांकडे न जाता ती अजित पवारांच्या पक्षाकडे वळावीत यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा कसा होतो याचं एक उदाहरण म्हणजे बीड नगरपरिषदेत भाजपला आणि पवारांच्या राष्ट्रवादीला हरवत निवडून आलेला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष. तीच रणनीती महानगरपालिकेत यशस्वी होईल का? हे पाहावं लागेल.
एकीकडे सरकारमध्ये सत्तेची ऊब... तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांमध्ये विरोधाची भूमिका. आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांची ही खेळी आहे की अडचण, असा सवाल सध्या विचारला जात आहे. कारण राज्यातील बहुतांश महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मात्र अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिला आहे किंवा थेट महाविकास आघाडीतल्या पक्षांशीच हातमिळवणी केली.
Ajit Pawar Mahayuti Politics : विरोधकांची स्पेस व्यापली
सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी विरोधकांची स्पेस कायम असते. अजितदादांना विरोधात उतरवून विरोधकांची हीच स्पेस संपवून टाकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे की काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे. भाजप विरोधातील पुरोगामी विचारांची मतं काँग्रेस किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे न जाता ती अजित पवारांकडे जावीत यासाठीचा हा चक्रव्यूह असल्याचं बोललं जातंय.
BJP Strategy On Muslim Votes : मुस्लिम मतं विभागण्यासाठी रणनीती?
ज्याठिकाणी विरोधकांची आघाडी मजबूत आहे अशा कोल्हापूर, चंद्रपूर , अकोला, नांदेड, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली सारख्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मदत करण्यासाठी अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचं दिसतंय. मात्र जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि ती मतं विरोधी पक्षांकडे जाऊ शकतात अशा छत्रपती संभाजीनगर, धुळे, परभणी , अमरावती अशा महापालिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय.
मुंबई महापालिकेत नवाब मलिक यांना पुढे करून अजित पवारांच्या पक्षाने भाजप आणि शिंदे सेनेला हिंदुत्वाचा मुद्दा वापरता येईल याची काळजी घेतल्याचं बोललं जातंय. अजित पवारांनी भाजप नेतृत्वाच्या सोबत चर्चा करून ही रणनीती ठरवली असावी असं विश्लेषकांचे म्हणणं आहे आणि प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाने या चर्चेला आणखी बळ मिळालंय.
राज्यातील सत्तेत सहभागी असलेले तीन पक्ष काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषदच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र त्यांनी ना एकमेकांवर टीका केली ना कारभाराचा पंचनामा केला. त्यामुळं त्या निवडणुकीतील विजय देखील तीन पक्षांनी एकत्रित एन्जॉय केला. तेच धोरण महापालिका निवडणुकांमध्ये राबवून विरोधकांची स्पेस देखील काबीज करण्याची रणनीती आखण्यात आलीय का? त्यामुळेच अजित पवार विरोधात लढतायत का? प्रशांत जगतापांच्या पक्षांतरामुळे हे प्रश्न आणखी मोठे होत चालल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा:























