Ajit Pawar: तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics: साहेब निवडणुकीला उभेच नव्हते, मग चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पराभवाची भाषा करणे चूक होतं; अजितदादांनी सुनावले. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना थेटपणे खडेबोल सुनावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे: चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य हे चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते गुरुवारी शिरुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी थेटपणे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खडे बोल सुनावले.
शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो, अशी जाहीर कबुलीच अजित पवार यांनी दिली. मात्र, अजित पवारांनी इतक्या उघडपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बारामती लोकसभेच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा थेटपणे टीका केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांचे, शरद पवार यांना बारामतीमधून संपवण्याचे वक्तव्य योग्य नसल्याचे अजितदादांनी सडेतोडपणे सांगितले आहे. यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांची प्रचारातील अनुपस्थिती चर्चेचा विषय
राज्यात 2014 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्याखालोखाल चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचे महत्त्वाचे नेते म्हणून बघितले जात होते. चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शाह यांच्याशी चांगले संबंध असल्याने अनेकजण त्यांना वचकून होते. परंतु, यंदाच्या लोकसभेच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांचे अस्तित्व ठळकपणे दिसून आले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांपासूनही अंतर राखून आहेत. त्यामुळे भाजपने इतक्या महत्त्वाच्या नेत्याला प्रचारापासून दूर का ठेवले, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले?
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते.
आणखी वाचा
चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















