अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे

शिर्डी: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या वाट्याला गेला, शिवसेनेकडून यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपला (BJP) सुटली असून भाजपने सुहास शिरसाट (Suhas Shirsat) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे पुत्र समीर सत्तार (Sameer Sattar) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर, स्वतः अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप करत टीका केली. त्यामुळे, महायुतीमधील शिवसेना-भाजपाचा अंतर्गत युद्ध चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेनेनं एकत्र यायला हवं, असेही म्हटले होते. त्यावर, आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. त्यावर, आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका का स्वीकारली, त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा, असे संजय राऊत यांनी म्हटले. भाजपबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी, महाराष्ट्राला खड्डयात घालणं आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वावाला सांगावं, त्यावर जाहीरपणे भूमिका व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवरुन प्रतिक्रिया दिली.
शिवसेना एकच आहे, हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शहांची शिवसेना आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. निवडणूक आयोग हाताशी धरून कटकारस्थान करून अमित शाहांनी तात्पुरती कंपनी निर्माण केलीय. ज्यांना कृत्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेशी चर्चा करावी, असे आवाहन देखील त्यांनी केलंय.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
"शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला (Kamakhya Temple) माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे." अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली. तसेच, "आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिलं काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे." असेही सत्तार यांनी म्हटले.
दरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र यायल्या हव्यात असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरही संजय राऊतांनी भूमिका मांडली.
हेही वाचा





















