Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास, अफवांवर विश्वास ठेवू नका; आदित्य ठाकरे काय म्हणाले?
Aaditya Thackeray On Operation Tiger : गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी आमच्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुणे : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे खासदार आमच्यासोबत आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले. लोक अंधभक्त असतात, पण आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास ठेवतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असल्याने त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
आमच्यासोबत जे लोक आहेत त्यांना 2024 च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. संसदेत दोन तृतियांश बहुमत हवं असल्याने भाजपकडून देशभर तोडफोड सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Uddhav Thackeray Shivsena Meeting : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना आज ना उद्या पश्चाताप होणार असं उद्धव ठाकरे ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीत म्हटल्याची माहिती आहे. 2002 च्या ऐतिहासिक उभ्या फुटीनंतर जवळपास चार वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे.
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला नऊ पैकी पाच खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीनं हात धरुन थांबवण्यात काय अर्थ असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा 60 व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या हालचाली शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर राबवलं जाऊ शकतं. पण यात एक कायदेशीर अडचण आल्यानं सध्यातरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात अडकल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार हे पाहावं लागेल.
खासदारांच्या बैठकीच्या निमित्तानं ठाकरेंची पहिली लिटमस टेस्ट पार पडली. या बैठकीला नऊ पैकी पाच खासदार अनुपस्थित होते. आता 19 तारखेला शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांची दुसरी लिटमस टेस्ट पार पडणार आहे. त्या कार्यक्रमाला किती खासदार उपस्थित राहतात, यावरून भविष्यात काय घडणार हे दिसेल.
ही बातमी वाचा :
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल






















