Samruddhi Mahamarg : इगतपुरी ते कसारा फक्त 8 मिनिटात, समृद्धी महामार्गावर राज्यातील सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार आहे.

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे (Igatpuri to Amane) या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते. या मार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार आहे. 76 किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत.मात्र सर्वाधिक लांबीचा 8 किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो. राज्यातील सर्वाधिक लांबीचा हा बोगदा आहे. काय आहेत या बोगद्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात...
बोगद्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
- 17.5 मीटर रुंदी आणि 9 मीटर उंचीचा हा बोगदा असून याला एकूण तीन लेन आहेत. ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने येथून प्रवास करता येणार आहे.
- बोगद्यातील भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन देतानाच भिंतींना लाईट रिफ्लेकटींग लावण्यात आले आहे, ज्यामुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट दिसतो.
- प्रत्येक 300 मीटर अंतरावर एक असे एकूण 26 क्रॉस पॅसेज देण्यात आले आहे. एखादा अपघात घडला तर जवळच्या क्रॉस पॅसेजमधून बाहेर पडता येईल.
- प्रत्येक 90 मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे, एखाद्या वाहनाला आग लागली आणि बोगद्यातील तापमान 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाली तर अटोमॅटिक स्प्रिंकल सुरू होतात, देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. डेन्मार्कहून हे तंत्रज्ञान मागविण्यात आले आहे.24 मीटरचा एक झोन आहे, असे एका टनेलमध्ये 286 आणि दोन्ही बोगदे मिळून 572 झोन तयार करण्यात आले आहे.
- 100 डबल एक्सल रिव्हसेबल व्हेंटिलेशन फॅन बसविण्यात आले आहेत. यामुळे हवा खेळती राहण्यास आणि गाड्यांचा धूर बाहेर निघण्यास मदत होणार आहे.
अखेर प्रवाशांची प्रतीक्षा संपली
दरम्यान, 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटर टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला आणि वाहतूक सेवेचा भाग बनला. यानंतर 26 मे 2023 रोजी शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या 25 किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व टप्प्यांमुळे मार्च २०२४ पासून नागपूर ते इगतपुरी या ६२५ किलोमीटरच्या प्रवासात लक्षणीय गती मिळाली. मात्र नागपूर ते मुंबई थेट आठ तासांत प्रवास केव्हा शक्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यासाठी इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर टप्प्याचे वाहतूक सेवेत समावेश होणे अत्यावश्यक होते. अखेर प्रवाशांची ही प्रतीक्षा संपली असून, गुरुवार 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या लोकार्पणानंतर हा टप्पा वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू
























