Nagpur Violence: कबरीचा वाद चिघळला! नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? राड्याची A to Z कहाणी
Nagpur Violence Updates: नागपूरच्या महल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. यावेळी प्रचंड दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

Nagpur Violence: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं.
त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगव. मात्र कालांतराने ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा त्याच परिसरात जमा झाला. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्याने पोलिसांना या जमावाला पांगवण्यात काहीसे अपयश आले. परिणामी पोलिसांनी पोलिसीबळाचा वापर केला असता जमावाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली.
नागपुरातील घटनेत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
नागपुरात काल सोमवारी 1 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी काल दुपारी बारा वाजता महालच्या शिवाजी चौकात आंदोलनाला एकत्र आले
– 1:30 वाजता - आंदोलनादरम्यान चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली.औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.
– दुपारी 3 वाजता : दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदविला
– दुपारी 3:30 वाजता पोलिसांनी परिस्थिती शांत केली
– दुपारी 4 वाजता : विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात एकत्र यायला सुरवात झाली
– सायंकाळी 5 वाजता : औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र समाजमाध्यमांवर वायरल झाले.
– सायंकाळी 7 वाजता : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून व मुस्लिम गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकमेकांच्या विरोधात नारेबाजी सुरु झाली. त्यानंतर पोलीसांनी अधिकची कुमक मागवून घेतली
– रात्री साडेसात वाजता पोलिसांनी दोन्ही गटाला आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.
– रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.
– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
– दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.
– दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.
– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली
– रात्री - 9 वाजता एका गटाकडून भालदारपुरा व चिटणवीस पार्क परिसरात भागात जेसीबी व वाहनांची जाळपोळ सुरु झाली. काही स्थानिकांच्या घरांवर हल्ले झाले
– दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलीस देखील रस्त्यावर उतरली
– रात्री 10:30 नंतर पोलीसांनी दंगलखोरांनी धरपकड सुरु केली
– रात्री 12 वाजता हंसापुरी व गीतांजली थेटर परिसरात काही वाहनांची तोडफोड करत स्थानिकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले
– रात्रभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत 46 आरोपींना ताब्यात घेत गणेशपेठ पोलिसठाण्यात आण्यात आले.
प्रभावित भागात संचारबंदी लागू
दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारस चिटणीस पार्क चौकाकडून एक मोठा गट महालच्या परिसरात आला. तोपर्यंत गणेशपेठ पोलीस, कोतवाली पोलीस, इतवारी पोलीस स्टेशन शिवाय अधिकची पोलीस कुमक महाल आणि लगतच्या परिसरात तैनात करत या जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्लीबोळात शिरला आणि तिथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. यात अनेक दुचकी आणि कार जाळल्याची घटना घडली.
या राड्यात नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले असून त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते. ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा मार बसला आहे मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत.
सध्या नागपुरातील परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून महालसह परिसरात आज बंद पाळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गरज नसल्यास घरा बाहेर न पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

