SRPF : मोठी बातमी,अखेर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
SRPF Recruitment : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांच्याकडील 2024-25 च्या पोलीस शिपाई भरतीमधील प्रश्नपत्रिकेत खासगी क्लासमधील प्रश्नपत्रिकेतील 85 टक्के प्रश्न विचारण्यात आल्यानं खळबळ उडाली होती.

मुंबई/ पुणे : महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड लेखी परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आल्याचं प्रकरण एबीपी माझानं लावून धरलं होतं. या प्रकरणी विरोधी पक्षांकडून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत पोलीस उपमहानरीक्षक पुणे यांनी संबंधित प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
एबीपी माझाने सदर भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आल्याची बाबा समोर आणली होती. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अप्पर पोलीस महासंचालक यांनी पत्रक काढत भरती स्थगित करत असल्याची घोषणा केली.
एसआरपीएफनं काय म्हटलं?
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच. पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर आपल्या राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासन कसा खेळ करतंय पाहा म्हटलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत एसआरपीएफ गट ५ दौंड येथे रविवारी लेखी परीक्षेचा पेपर पाडला. मात्र या पेपरच्या स्वरूपाबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांमधे संतापाचे वातावरण तयार झाले आहे. कारण या परीक्षेत महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीने तयार केलेल्या प्रश्नसंचामधील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. पोलीस दलासारख्या महत्वाच्या भरतीचे प्रश्नसंच स्वतः तज्ञ अधिकाऱ्यांनी काढणे अपेक्षित असताना एकाच पुस्तकातील 85 प्रश्न प्रशासनाने घेतलेच कसे म्हटलंय.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत एका खाजगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचातील ८५ प्रश्न जसेच्या तसे घेणे म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञाचा कामचुकारपणा आहे की तोडपाणी? गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी जिवाचं रान करून अहोरात्र मेहनत करतात आणि अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या भविष्याशी खेळणं योग्य आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला होता.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?























