एक्स्प्लोर
युती सरकारची दोन वर्षे पूर्ण, मात्र भाजप-सेनेमधला कलगीतुरा कायम

मुंबई: आघाडी सरकारला पायउतार करुन, महाराष्ट्राची सत्ता काबीज करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या दोन वर्षांच्या कालावधीतला कारभार पाहता भाजप आणि शिवसेनेमध्ये, 'तुझं माझं जमेना, अन् तुझ्या वाचून करमेना' असंच चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारला 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी, शिवसेनेने भाजपला साथ द्यायची की नाही, हे त्यांनी ठरवायचंय, असा टोला लगावला आहे. ''आम्ही तर सेनेला आमच्यासोबत आहे असंच मानतो. आता सेनेचा यात वाटा आहे का हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे,'' असं त्यांनी सांगितलं. यावेळी शेलारांनी शिवसेनेच्या महापालिकेच्या कारभारावरुनही ताशेरे ओढले. मुंबईकरांना 60 वर्षात जे मिळायला हवं होत ते मिळालं नाही. पण 60 आठवड्यात या राज्य सरकारला वेळ मिळला, आणि सरकारने मुंबईला मिळवून दिलं असा टोला त्यांनी लगावला. या पत्रकार परिषदेत शेलारांनी राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. मात्र, शिवसेनेचा यात वाटा आहे का? असा प्रश्न विचारला असता, त्याला बगल देत, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे असं सांगितलं. युवासेनेच्या मोर्चावरुनही शेलारांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, ''आदल्या दिवशी शिक्षणावर मोर्चा काढायचा, दुसऱ्या दिवशी EBC शिक्षण फी सवलतीवर आमच्यामुळे निर्णय झाला, असे श्रेय घ्यायचं. त्यामुळे श्रेयाची लढाई कोण करत हे जनतेला माहित आहे. वास्तविक, या कामाचं श्रेय हे मुख्यमंत्र्यांचं आहे'' असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील ही सगळी नौटंकी आहे, असं सांगत शिवसेनेच्या अनिल परब यांनी शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















