एक्स्प्लोर
शिवसेनेची सत्ता न आल्यास भाजपकडून मुंबईचे तुकडे : राऊत

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता न आल्यास भाजप मुंबईचे तुकडे पाडेल, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईवर शिवसेनेचा अधिकार आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. इथे दुसऱ्या कोणाचं राज्य येण्याचा प्रयत्न झाला तर मुंबईचा तुकडा पाडायला हे दिल्लीमधले आणि मुंबईतले काही लोकं बसले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. मुंबई वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी शिवसेनेचा वरचष्मा पाहिजे. यामुळे जो 60 आकडा उद्धव साहेबांनी दिला आहे तो अत्यंत विचारपूर्वक आणि सन्मानपूर्वक दिलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले. 60 जागा ही तडजोडच उद्धव ठाकरेंनी जो 60 चा आकडा प्रस्तावात दिलेला आहे, त्यावरती पूर्ण विराम दिलेला आहे, त्यापलिकडे उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असंही राऊत यांनी निक्षून सांगितलं. शिवसेना 60 जागा देतेय ही तडजोडच आहे. खरं तर 50 असायला हवी, 55 असायला हवी होती, पण 60 ही युती टिकावी, युती रहावी म्हणून केलेली तडजोड आहे, असं संजय राऊत म्हणाले. 'युतीसाठी आम्ही 60 जागांचा आकडा दिला. आमच्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की 60 चा आकडा सुद्धा जास्त आहे. मुंबईवर शिवसेनेचा अधिकार आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे. लोकसभा, विधानसभामध्ये मागे काय झालं ते विसरा... तुम्ही वर्तमानात जगा... भविष्यकाळ हा शिवसेनाच आहे. भूतकाळात काय घडले ते विसरुन जा' असं राऊत यांनी सांगितलं. शिवसेना बहुमताचा आकडा गाठेल शिवसेना जास्तीत जास्त जागा लढवेल. युती असो अथवा नसो, बहुमताचा आकडा शिवसेना पार करेल अशी शिवसेनेची ताकद असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. विधानसभेला एक-दोन आमदार कुणाचे जास्त आले गेले, म्हणून आम्ही हिशोबाला बसून आकडे लावत बसत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व असायला पाहिजे ही देशाची इच्छा आहे. मुंबईवर जोपर्यंत शिवसेनेचा वरचष्मा आहे, तोपर्यंत राष्ट्रीय हित सुरक्षित आहे, असं आम्ही मानत असल्याचं राऊत म्हणाले. विधानसभेत जागावाटपाच्या वेळी जे झालं, तो काय सन्मान होता का...? असा सवालही राऊत यांनी विचारला.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















