Sadichcha Sane Murder: सदिच्छाच्या मृतदेहाचे सर्च ऑपरेशन थांबवले; मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा, वडिलांचं वक्तव्य
sadichha Sane : पोलिसांनी नौदलाच्या माध्यमातून सदर ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. मात्र दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली

Sadichha Sane Murder : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली आरोपी मितू सिंहने दिली आहे. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचंही आरोपीने कबूल केले आहे. दरम्यान याप्रकरणी वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात सदिच्छा सानेचा मृतदेह शोधण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं होतं. मात्र तिचा मृतदेह हाती न लागल्याने आज नौदलाकडून शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मितू सिंह सातत्याने मागचा दीड वर्षात आपला जबाब बदलत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच खून केल्याची कबुली तर दिलीच शिवाय ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासूनच पोलिसांनी नौदलाच्या माध्यमातून सदर ठिकाणी शोधमोहीम सुरु केली. मात्र दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली आणि पुन्हा एकदा नव्याने दुसऱ्या यंत्रणांच्या माध्यमातून शोध मोहीम करणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली
सदिच्छाची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा, वडिलांचा आरोप
दरम्यान सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे, असा आरोप सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी केला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मागील 14 महिन्यांपासून आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याच सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही? तसंच तिच्याजवळ असलेलं साहित्य अजून पोलिसांना का मिळालं नाही? असे सवाल उपस्थित करत या प्रकरणात योग्य तपासणी करुन कारवाई केली जावी अशी मागणी सदिच्छाचे वडील मनीष साने यांनी केली आहे.
29 नोव्हेंबर 2021 ला सदिच्छा झाली होती गायब
दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघरमध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप























