एक्स्प्लोर
रेल्वे भरतीत डावलेल्या राज्यातील 300 उमेदवारांची हायकोर्टात धाव
रेल्वेची भरती प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय तपासणीतही पास झालेल्या शेकडो तरुणांना रेल्वे प्रशासनाने नोकरभरतीत डावलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात राज्यभरातील 300 उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई : भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वैद्यकीय तपासणीतही पास झालेल्या राज्यातील शेकडो तरुणांना रेल्वे प्रशासनाने चतुर्थ श्रेणी नोकरभरतीत डावलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी मुंबई, नागपूर, पुण्यासह राज्यातील शेकडो उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार पदांसाठी रेल्वे प्रशासनाने 2007 साली जाहिरात काढली होती. 2011 साली प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या भरती प्रक्रियेत मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूरसह राज्यातल्या ग्रामीण भागातील इच्छुक तरुणांनी अर्ज केले होते. या भरती प्रक्रियेत अनेक तरुण वैद्यकीय तपासणीत पास झाले. त्यांना तसं पत्रही देण्यात आले. परंतु एकाही उमेदवाराची त्यामध्ये निवड झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांनी कनिष्ठ न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली. मात्र न्यायालयाने तरुणांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत रेल्वेच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाविरोधात योगेश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे आणि इतर उमेदवारांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर येत्या सोमवारी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
आणखी वाचा























