![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Navi Mumbai : नवी मुंबईत 'महाविकास आघाडी पॅटर्न'; आगामी पालिका निवडणूक तीन पक्ष एकत्र लढवणार
राज्यात राबवण्यात आलेला महाविकास आघाडी पॅटर्न आता मुंबईतही राबवण्यात येणार असून आगामी पालिका निवडणूक शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढवणार आहेत.
![Navi Mumbai : नवी मुंबईत 'महाविकास आघाडी पॅटर्न'; आगामी पालिका निवडणूक तीन पक्ष एकत्र लढवणार Navi Mumbai Election Mahavikas Aghadi Pattern NCP Congress Shivsena to contest municipal elections together Navi Mumbai : नवी मुंबईत 'महाविकास आघाडी पॅटर्न'; आगामी पालिका निवडणूक तीन पक्ष एकत्र लढवणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/3188d7a22d4f08e0a82a02ea34279716_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई: नवी मुंबई मनपा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज सानपाडा येथे पार पडली. या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी नेते शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार असून बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडी मधील स्थानिक नेत्यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षापासून आमदार गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याने यावेळी ती खेचून घ्यायचीच असा चंग या तीन पक्षांनी केला आहे.
नवी मुंबई महानगर पालिका- 2015 मधील पक्षीय बलाबल (एकूण जागा-111)
राष्ट्रवादी - 57
शिवसेना - 38
भाजपा - 06
काँग्रेस - 10
गेल्या दोन वर्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याने बदललेले पक्षीय बलाबल
सध्याची स्थिती
भाजपा - 51 (गणेश नाईक गट)
शिवसेना - 50
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
काँग्रेस - 6
महापालिकांच्या आरक्षणाची सोडत 31 मे रोजी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरु केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे. तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाने आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग जवळ-जवळ फुंकल्यात जमा झालंय. राज्यात लवकरच नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामधील 13 महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)