Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पोलीस पथक जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले.
मुंबई : 'रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. 53 वर्षीय इंटिरियर डिझायनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अर्णब यांना ही अटक झाली आहे. आता मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध आणखी एक एफआयआर दाखल केली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. मात्र अर्णब यांनीच महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पोलीस पथक जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले.
FIR registered against Republic TV Editor-in-chief Arnab Goswami for allegedly assaulting a lady police officer when police team reached his residence in Mumbai this morning.
— ANI (@ANI) November 4, 2020
Arnab Goswami Arrest | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सकाळी काय घडलं? आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना अलिबागला घेऊन गेले.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्वीट केलं आहे. "काही काळापूर्वी इंडियाज मोस्ट वॉण्टेड नावाचा शो होता आणि अँकर हत्या, आत्महत्या या मुद्द्यावर भाष्य करत असे. पण याच अँकरला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2 आहे. दुसरा अँकर तेच करतोय, आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
- कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- आम्ही पोपट बीपट पाळत नाही.. गोस्वामी यांच्या अटकेवरुन चंद्रकांत पाटील यांचे सत्ताधाऱ्यांना उत्तर