मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबई महापालिकेची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा दुसरीकडे होत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार देणार असल्याचे कळतंय.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका (Mumbai) निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत महापौर (Mayor) कोणाचा, उपमहापौर कोणाचा, आणि स्थायी समिती अध्यक्ष कोणाचा या सगळ्या विषयाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. यासंदर्भात शेवटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज उद्यामध्ये होईल आणि नावही अंतिम होईल. त्यामध्ये भाजपकडून (BJP) महापौरपदासाठी राजश्री शिरवळकर, रितू तावडे आणि शितल गंभीर या तीन नावांची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे यांच्या मिळणाऱ्या उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या दोन नावांची चर्चा आहे. विशेष म्हणजे, स्थायी समिती अध्यक्ष पद हे सुद्धा भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे, महिलेकडेच मुंबईची धुरा असणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा दुसरीकडे होत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार देणार असल्याचे कळतंय. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे. त्यानुसार, आमची माणसं कामाला लागली आहेत, असे आदित्य यांनी म्हटलंय. त्यामुळे, 7 फेब्रुवारीला महापौर पदाच्या उमेदवारीसाठी ठाकरेंची शिवसेना अर्ज भरण्याची शक्यता आहे. बहुमत नसलं तरी ठाकरेंची शिवसेना आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. भाजपचे 89, शिंदे शिवसेनेचे 29, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन असे 121 संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून येण्यास कुठलीही अडचण येणार नाही हे स्पष्ट चित्र आहे.
स्थायी समितीचं गणित कसं?
स्थायी समितीमध्ये लागलेल्या निकालानंतरची आकडेवारी बघता सदस्यांची संख्या विरोधकांची 13 आणि सत्ताधाऱ्यांची 13 होत होती. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आपली ताकद वाढण्याची दृष्टिकोनातून शिंदे शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मदत घ्यायचं ठरवलं आहे. शिंदे शिवसेना पक्षाने आपली गट नोंदणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहयोगी गट म्हणून गट नोंदणी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकाची अट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठेवल्याने चर्चा पुढे जात नसल्याचं कळतंय.
खर तर मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे झाले. मात्र, चर्चेचं गुराळ अजूनही संपलेलं नाही. आधी महापौर आरक्षण, नंतर संयुक्त गटावर चर्चा सुरू आहे. अजित पवारांचे निधन आणि त्यानंतर महापौर पदाचा अंतिम निर्णय, यामुळे बराचसा वेळ मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर बसवण्यामध्ये गेला आहे. आता, 11 फेब्रुवारीला अखेर मुंबई महापालिकेचा महापौर ठरणार आहे. मात्र, तो कोण असेल, ती महिला कोण असेल याचीच वाट सर्वजण पाहात आहेत.























