Marathwada Rain : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर; देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या निमगावमध्ये, तर अजित पवारांची माढ्यातील मुंगशीत पाहणी
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमगाव आणि दारफळ येथे शेती नुकसानाची पाहणीसाठी दाखल झाले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील मुंगशी माढा गावामध्ये पाहणी केलीय.

Marathwada Flood : राज्यभरात पावसाने एकच धुमाकूळ घातला असून या अतिवृष्टीमुळे बळीराज्याच्या तोंडचा घास हिरवला आहे. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला (Marathwada Flood) बसला आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) निमगाव आणि दारफळ येथे शेती नुकसानाची पाहणीसाठी दाखल झाले आहे. निमगाव या गावात 50 ते 60 घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाले असून शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सोलापूर जिल्ह्यातील मुंगशी माढा गावामध्ये पाहणी केलीय. त्यांनी सीना नदीवरील बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवारांनी लोकांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांनी एबीपी माझाकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत. अनेक गावांना भेटी देत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नव्हता, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरे, जनावरे, मोटारी, पाईप, डीबी, पोल आणि तारा वाहून गेल्या आहेत. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी द्या, शेतकऱ्यांची मागणी (Marathwada farmers Demands)
"हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी द्यायचे पाहिजे," अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. अजित पवारांनी मोटारी आणि डिपोची भरपाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर नदीकाठच्या सर्व गावांचे पूर्ण नुकसान झाले असून, सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर आमदार सुरेश खाडे यांनी देखील दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे सांगितले आहे. या योगदानामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला मिळणाऱ्या या योगदानामुळे पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत पोहोचण्यास हातभार लागणार आहे. अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडूनही या निधीसाठी योगदान अपेक्षित आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या बांधवांना आधार देण्यासाठी हे आर्थिक सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे. या निधीमुळे पूरग्रस्त भागातील पुनर्वसन आणि मदतकार्याला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























