'...तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक', संजय राऊतांची 'रोखठोक' टीका
शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या 'रोखठोक' सदरातून राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या 'रोखठोक' सदरातून राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. त्यांनी म्हटलंय की, नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही
राऊत यांनी लिहिलं आहे की, मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले. त्यात कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे. ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. भारतात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. देशहिताचा विचार आता संकुचित ठरत आहे. पक्षहित व व्यक्तिपूजा म्हणजेच देशहित. राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पश्चिम बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधानांना विशेष रस
राऊतांनी म्हटलं आहे की, मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. बिहारात निवडणूक झाल्या. तिथे तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्याशी टक्करच घेतली. बिहारचे नितीशकुमार व भाजपाची सत्ता प्रामाणिक मार्गाने आली नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचेच नेते विजय वर्गीय यांनी केला. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपाची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या






















