एक्स्प्लोर
जमीन खरेदीसाठी कोकणात गेलेल्या मुंबईतील महिलेची हत्या
मुंबईतील एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या स्मिता कुसूरकर या संगमेश्वरमध्ये गेल्या होत्या.

रत्नागिरी : जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी मुंबईतून कोकणात गेलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकार रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात घडला आहे. स्मिता कुसूरकर असं मृत महिलेचं नाव असून त्यांचा मृतदेह संगमेश्वरजवळ्या चिरेखाणीत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी श्रीकांत घडशी या इसमाला अटक केली आहे. मुंबईतील एका खाजगी कंपनीतून वरिष्ठ पदावरुन दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या स्मिता कुसूरकर 11 जुलै रोजी एका जमिनीच्या व्यवहारासाठी कोकणात जात असल्याचं सांगत घरातून निघाल्या होत्या. मात्र 16 जुलैपर्यंत त्या मुंबईत न परतल्याने आणि त्यांचा मोबाईलही बंद लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील ना म जोशी मार्ग पोलिस स्थानकात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
यानंतर हा तपास रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाकडे आला. तपासात स्मिता कुसूरकर यांचा मोबाईल शेवटचा रत्नागिरीमध्ये वापरल्याचं समोर आलं. शेवटचं संभाषण संगमेश्वर इथल्या श्रीकांत घडशी या इसमाशी झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी श्रीकांत घडशीचा माग काढल्यावर तो गायब असल्याचं समजलं.
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबईतून पकडलं. यानंतर आपणच स्मिता कसूरकर यांची हत्या केल्याची कबुलही दिली. स्मिता कसूरकर यांची हत्या करुन मृतदेह संगमेश्वर नजीकच्या चिरे खाणीत टाकल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी चिरे खाणीतून मृतदेह बाहेर काढून तो स्मिता कसूरकर यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
स्मिता कसूरकर यांनी जमीन व्यवहारात काही लाख रुपये अदा केल्याची माहिती पुढे आलं आहे. दरम्यान त्यांची हत्या करणाऱ्या श्रीकांत घडशी याच्यावर याआधी स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.
आणखी वाचा























