Raju Shetti on Toll: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजू शेट्टींचा पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध; म्हणाले; वसूली तातडीनं बंद न केल्यास..
राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली आहे.

Raju Shetti on Toll: खड्ड्यातील रस्त्यांवर टोल आकारला जाऊ शकत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळली आहे. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली आहे. येत्या आठवडाभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करणार
राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाकडून टोल वसुली करता येणार नाही. काल याबाबत मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तातडीने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावे याबाबत कायदेशीर मार्गाने नोटीस देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार आहे.
काय आहे प्रकरण?
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पलियाक्कारा टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या (Kerala High Court) आदेशाला आव्हान देणारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) National Highways Authority of India (NHAI) ची अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राष्ट्रीय महामार्ग 544 च्या एडापल्ली-मनुथी भागाच्या खराब स्थितीबाबत हा आदेश देण्यात आला. मुख्य न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सोमवारी हा खटला राखून ठेवला होता. मंगळवारी निकाल देताना, दोन्ही अपील फेटाळण्यात आल्याचे खंडपीठाने सांगितले. सुनावणीदरम्यान, रस्त्याच्या भयानक अवस्थेबद्दल खंडपीठाने एनएचएआयवर सडकून टीका केली.
तर 150 रुपये का द्यावेत?
एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 12 तास लागतात तर 150रुपये का द्यावे? ज्या रस्त्याला एक तास लागण्याची अपेक्षा आहे, त्याला आणखी 11 तास लागतात आणि त्यांना टोलही भरावा लागतो, असे सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी या मार्गावरील वाहतूक कोंडीच्या माध्यमांच्या वृत्तांचा संदर्भ दिला आणि सांगितले की दोन्ही न्यायमूर्तींनी वैयक्तिकरित्या या मार्गावर कोंडीचा अनुभव घेतला आहे. गवई यांनी टिप्पणी केली की राष्ट्रीय महामार्गांवरील गटारे, खड्डे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही अकार्यक्षमतेची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























