देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
राजू शेट्टी म्हणाले की, होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले आरोप ऐका.

Raju Shetti on Devendra Fadnavis: देवेंद्रजी तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाला आहे हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैद्य व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?
राजू शेट्टी यांनी आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलिसांवर केलेल्या आरोपांच व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, माझे तत्कालीन लोकसभेतील सहकारी आमदार निलेश राणे यांनी अत्यंत वास्तव घटना समाजासमोर मांडली आहे. राज्यात अवैद्य धंद्याना ऊत आलेली आहे हे जळजळीत सत्य सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो की महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचे वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला.
महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे
राजू शेट्टी म्हणाले की, होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले हे आरोप ऐका. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस जर दोन ते अडीच कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होवून विचार करा.
लोकांकडून पोलिस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत
त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांना माहित आहे अमली पदार्थाची विक्री कोण करतंय, मटका कोण चालवतंय, अवैद्य दारू विक्री कोण करतय, गांजा कोण पुरवत आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून पोलिस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आकडेवारी सांगितली आहे त्यापेक्षा कोल्हापूर, सांगली , पुणे , मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक यासारख्या ठिकाणी तर राजरोसपणे पोलिसांना हप्ते देवून दरमहा शेकडो कोटीची वसुली सुरू असल्याने अवैद्य धंद्याचा महापूर आला आहे.
तर आधीच टीप देवून सावध केले जाते
त्यांनी म्हटलं आहे की, मटका सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15 ते 25 हजार , अवैद्य दारूविक्रीसाठी दरमहा 10 ते 15 हजार , अमली पदार्थ विक्रीतून दरमहा 75 हजार ते 1.50 लाख , गांजा विक्रीतून दरमहा 25 ते 50 हजार , अवैद्य लॅाज व्यवसायासाठी दरमहा 10 ते 15 हजार याप्रमाणे पोलिसांचे सरासरी दर ठरले असून ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहेत त्यांचे दर तर गगनाला भिडलेले आहेत. राज्यातील पोलिस दलातील पोलिस ठाण्यातील बीट अंमलदार , पोलिस निरीक्षकपासून ते जिल्हापोलिसप्रमुख कार्यालयातील, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा गुप्तचर शाखेच्या पोलिस निरीक्षकांना सर्व अड्डे माहित आहेत. एखाद्या ठिकाणी पोलिस कारवाई करणार असतील तर कारवाई होण्या आधीच संबंधितांना टीप देवून सावध केले जाते, असा आरोपही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या






















