राष्ट्रवादीचं 'मिशन 2022'; मुंबई महापालिकेत 8 चे 60 नगरसेवक झाले पाहिजेत : अजित पवार
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिरात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. मुंबईत सध्या राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. ते 50-60 झाले पाहिजेत असं अजित पवारांनी म्हटलं.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन 2022 हाती घेतलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक 8 वरुन 60 झाले पाहिजेत, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चुनाभट्टीतील सोमय्या मैदानावर आज दिवसभर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे सध्या आठ नगरसेवक आहेत, ते वाढून 50-60 झाले पाहिजेत. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे आजवर जास्तीत जास्त 14 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. वॉर्डात काम केलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. महिन्यातला एक दिवस मुंबईला देणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितंल.
मिशन 2022 हे शिवसेना-काँग्रेसला धक्का देण्यासाठी आहे, हा चुकीचा प्रचार केला जात आहे. विरोधी पक्ष आपली महाविकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही 'दिवार तुटती क्यू नहीं' असं विरोधकांना वाटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे, तो आपला मित्र पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी दोन क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
पक्षाची बदनामी होईल आणि पवार साहेबांना मान खाली घालावी लागेल, असं काम करु नका. आपलं सरकार आलं म्हणून चिकटायला आले तर अशांना जवळ करु नका. दोन वर्षे वाट बघा तो आपल्याबरोबर राहतो की नाही. मुंबईचे नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडले तर बाकीचे अध्यक्ष आपल्याला सोडून गेले. त्यांचा काही उपयोग नाही. सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्र वाघ, संजय पाटील यांना सगळं दिलं मात्र ते निघून गेले. त्यामुळे आता अशी माणसं शोधू जी सरकार असो किंवा नसो, सोडून जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.
मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महाराष्ट्राची अस्मिता आहे. या अस्मितेला भाजपने धक्का लावण्याचं काम केलं आहे. भाजप सरकारच्या काळात मुंबईतील अनेक प्रकल्प मुंबईबाहेर आणि राज्याबाहेर गेले. ज्यांनी हे काम केलं, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं.
Before You Go
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
महत्त्वाच्या बातम्या

















