Maharashtra Rains LIVE : मुंबईसह राज्यभरातील पावसाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Mumbai Maharashtra Rain LIVE Update : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Background
Maharashtra Rain : पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यात पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ह्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 70-200 मिमीपर्यंतचा पाऊस अपेक्षित असेल. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांकरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिथे 70 ते 200 मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
महापुरात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकार पाच लाख तर केंद्र सरकार दोन लाख रुपये मदत देणार: अजित पवार
महापुरात मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार तर केंद्र सरकार 2 लाख मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावावर सात बारा असेल तर त्यांच्या नातेवाईकांना गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु असलेल्या योजनेतून आणखी दोन लाख मिळणार असल्यांचही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार, पूरग्रस्तांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा
अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी शरद पवरांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते.
पुढच्या पाच दिवसात राज्यात पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे
दीड महिन्याच्या कालावधीत राज्यातील धरणांत 47 टक्के पाणीसाठा
राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. 13 जून ते 26 जुलै या दीड महिन्यात 373 टीएमसी पाण्याची धरणात नव्याने आवक झाली आहे. सध्या एकूण 3 हजार 267 प्रकल्पामध्ये सुमारे 680 टीएमसी म्हणजेच 47 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 39 टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध होता.























