वातावरण निवळणार, थंडीला सुरुवात होणार, नेमकं कसं असणार हवामान?
महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील वातावरण निवळणार असून, हळूहळू थंडी वाढणार आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील वातावरण निवळणार असून, हळूहळू पहाटेच्या किमान तापमानाचा पारा 2 ते 3 डिग्रीने घसरुन सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसानंतर तापमानाचा अजून खाली घसरण्याची शक्यता आहे. संक्रांती दरम्यान राज्यात चांगली थंडी जाणवण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
विदर्भात चांगली थंडी पडण्याची शक्यता
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः विदर्भात चांगली थंडी पडण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या लगेचच थंडीच्या लाटीची अपेक्षा नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. एका मागे एक पश्चिमी झंजावात साखळी उत्तर भारतात सुरुच आहे. आज (12 जानेवारीला) मध्यम पश्चिम झंजावात वायव्येकडून प्रवेशित होवून आपल्याकडील येणाऱ्या अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकतो अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना, अजूनही केरळ, तामिळनाडू या राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्याचाच परिणामातून महाराष्ट्रात होत असल्याचे खुळे म्हणाले.
उत्तर भारतात अजूनही दाट धुकेच
दरम्यान, तीन आठवडे उलटले तरी पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये दाट धुके अजून चालूच आहे. अजूनही काही दिवस ही स्थिती राहू शकते. त्याचाच परिणाम आपल्याकडील खानदेशातील जिल्ह्यात होत आहे.
अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी
केवळ उत्तर भारतातच नाही तर अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे, अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. इतकेच नाही तर दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब सारख्या ठिकाणी सूर्यप्रकाश असेल पण थंड वाऱ्यामुळे लोक त्रस्त राहू शकतात. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत बिहारच्या बहुतांश ठिकाणी सकाळी आणि रात्री दाट धुके पडेल. त्याचवेळी, आजपासून पुढील चार-पाच दिवस आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
महत्त्वाच्या बातम्या





















