Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत पावसाचा बेरंग, राज्यात पुढील दोन- तीन दिवस पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. भातकापणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं.

Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. भातकापणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. रायगडमध्येही उरण, पाली, सुधागड परिसरात पावसानं हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह इथं जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. चंदगड, नेसरी परिसरात झालेल्या पावसानं कापणी केलेल्या भाताचं नुकसान झालं. आठवडी बाजारातही पावसानं तारांबळ उडाली.
नाशिकमध्येही पावसानं व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कॉलेज रोड परिसरात आयोजित केलेला सांजपाडव्याचा कार्यक्रम पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे तर तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. ज्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड आणि लातुरात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. ज्यात चंदगड नेसरी भागात मुसळधार पाऊस होत असल्याची माहिती आहे. दरम्यान असं असलं तरी कापणी केलेल्या भाताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे आठवडी बाजारांमध्ये तारांबळ बघायला मिळाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. दुसरीकडे उत्तर कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पालघरमधील डहाणू तालुक्यात पाऊस बघायला मिळाला. ह्यात आशागड, गंजाडसारख्या परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला.
दरम्यान, ह्या पावसामुळे पालघरमधील भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. तिकडे आज दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील येवला शहर आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटे जोरदार हजेरी लावली. ऐन सणाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जरी काही भागात पाऊस दिसत असला तरी पुढील 8 दिवसांनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच थंडीची चाहूल जाणवणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून आधीच सांगण्यात आलं होतं.
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
महत्त्वाच्या बातम्या






















