राज्यात ढगाळ वातावरण! पुन्हा पाऊस पडणार का? पुढील आठवडाभर कसं असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
Maharashtra Rain News : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठ दिवसात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं अनेक भागात पूर आले होते. त्यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. परवा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर( नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली.
दोन दिवस पावसाचा प्रभाव अधिक दिसणार (Maharashtra Rain )
दोन दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार दिनांक 15 ते 16 ऑक्टोबर ला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी पिक वाहून गेली आहेत. जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मान्सूनची शेवटची ही दोन आवर्तने
रब्बी हंगामातील चौथ्या आवर्तनातील शेवटच्या चरणातील कालावधीत तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाचव्या व शेवटच्या आवर्तनातील अपेक्षित पावसाचे स्वरुप पाहता, रब्बीच्या लागवडी व शेतकामासाठी हा पाऊस लाभदायीच ठरू शकतो, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सूनच्या परतीच्या पासाची सध्य:स्थिती
मान्सूनने आज त्याच्या परतीच्या प्रवासात यू. पी. एम पी. बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा प. बंगाल व पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे. त्याची आजची सीमा रेषा कारवार कलबुर्गी निझामाबाद कांकर केओंझघर सागर आयलंड गुवाहटी शहरातून जात असुन देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी 15 ऑक्टोबर च्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित 15 टक्के भुभागावरून मान्सून परतेल, असे वाटते असे खुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


















