Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे

Background
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, मंबई आणि परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे.
Rain News : कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Rain News : आज 10 वाजता कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार. कोयना धरणाचे दरवाजे 4 फूट 6 इंचाने उघडणार आहेत. धरणातून साधारण 32 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 98 टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक 22 हजारांपेक्षा जास्त आहे. पावसाचा जोर कमीच तरीही सतर्कता म्हणून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणासह मराठवाड्यात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणासह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.























