Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Background
Maharashtra Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात देखील पावसानं हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावासाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर जिल्ह्यातही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोदार पावसानं हजेरी लावल आहे. या पावसामुळं काही ठिकाणी शेतीच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि ठाण्यात आज 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळं कापूस पिकासह अनेक पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळं या पावासामुळं शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.
रत्नागिरीत जोरदार पावसाची हजेरी, शेती पाण्याखाली
रत्नागिरीत जेखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. संगमेश्वर इथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. गड नदी लगत असलेली अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे
पुढील तीन चार दिवस मान्सून सक्रिय राहणार
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहणार आहे. तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील होण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं भिवंडीत रस्त्यांवर साचलं पाणी
Bhiwandi Rain : हवामान खात्याने दर्शवल्याप्रमाणं पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असताना भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ, गुडघाभर पानी साचले आहे. तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धुळे तालुक्यात पावसाची संततधार, मिरचीचं पिक गेलं वाया, तर अन्य पिकं पडू लागली पिवळी
Dhule Rain : धुळे तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळं बोरी परिसरात कापूस, मका, बाजरी, मूग, उडीद आणि मिरची या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून परिसरात दिवस रात्र पाऊस सुरु आहे. यामुळं जमिनीत संपूर्णपणे ओल कायम आहे. तसेच तांडा कुंडाणे, वेल्हाणे,हडसुने आदी गावात सतत पाऊस पडत आहे. या पावसानं बहरलेल्या पिकामध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. आतापर्यंत झालेल्या सततच्या पावसाने मिरचीचे पिकं सडले असून मक्याच्या पिकावर लष्करी अळीने विळखा घातल्याने लागवडीचा आणि बियाणांचा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. यामुळं उत्पादन घटन्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.























