Maharashtra Rain Live Updates :कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2,100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
Maharashtra Rain Live : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Background
Maharashtra Rain Live Updates : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर पाऊस
नागपूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. पोहरा नदीला पूर आल्यामुळं त्याचे विहीर गावात शिरलं आहे. या गावाच्या परिसरातील काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना NDRF च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
कोल्हापूर पाऊस
कोल्हापूर शहरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरुच आहे. राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. या पावसामुळं कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले होते.
Koyana Dam : कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर, उकणी गावात शिरलं पुराचे पाणी
यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. उकणी गावात पुराचे पाणी शिरले आहे. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर स्थिती निर्माण झाली असून उकनी गावात पाणी शिरले आहे. काही घरात सुद्धा पाणी गेल्याची माहिती आहे. त्यामुळं गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले. नागरिकांनी 2 ते 3 फूट पाण्यातून चालत जाऊन मार्ग काढावा लागत आहे. जनावरांच्या गोठ्यात पाणी असल्याने चारा सुद्धा नष्ट झाला. ऐका महिन्यात दुसऱ्यांदा या गावाला पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करावा लागला. या भागातील शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे ही नुकसान झाले.























