Maharashtra Rain : पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, शेती पिकांना मिळणार जीवदान
आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पाऊस सुरु आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
पिकांच्या उत्पादकतेत घट होणार
दरम्यान, पेरणी होऊन महिना होत आलं तरी काही भागात पिकांना पाणी मिळालं नाही. महिनाभर झालं पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मका, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
जळगाव जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांना दिलासा
महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मूळ जागेवर आणि जमिनीपासून दिड किमी उंचीपर्यंतच्या जाडीत असलेला मान्सूनचा आस देशाच्या मध्यावर पूर्व -पश्चिम दिशेत मूळ जागेवर आहे. त्यामुळं पावसाची शक्यता असल्याची माहिती खुळे यांनी दिली. दरम्यान, मागील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन झाल्याने कापूस आणि सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे. शिवाय या पावसाने भूगर्भात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर आलेला हा पाऊस शेतकऱ्यांना मोठा आधार देणारा ठरला आहे.
वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर
वर्धा जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं नदी नाल्यांना पूर येऊ लागला आहे. वर्धा तालुक्यातील आंबोडा इथला एक युवक भदाडी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. पावसानं चांगलाच जोर पकडल्यानं नदी नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पाऊस आणखी दोन दिवस पडणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणा साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळं संथ गतीनं वाहतूक सुरु आहे. तर दुसरीकडं पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nandurbar Rain : तब्बल 27 दिवसानंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचून शेतकरी कुटुंबांनं व्यक्त केला आनंद
Before You Go
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
महत्त्वाच्या बातम्या





















