(Source: Dainik Bhaskar)
Raj Thackeray : शरद पवारांनी जातीजातींमध्ये भेद निर्माण केला ; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीजातींमध्ये भेद निर्माण केला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर केला.
Raj Thackeray : "मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शदर पवार (Sharad Pawar) यांनी शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायला सुरूवात केली. त्याआधीचे सर्व व्हिडीओ काढून पाहा शरद पवार यांनी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. शरद पवारांनी जातीजातींमध्ये भेद निर्माण केला. जातीजातींमध्ये जो भेद निर्माण करत आहात त्यातून सामाजात द्वेष निर्माण होत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतून शरद पवारांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत हे मी म्हणालो ते त्यांना झोबलं. परंतु, सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक होते असं सांगितलं होतं. परंतु, आता पुजेचे फोटो टाकून नाटकं करत आहेत. लोक जात मानत होते. परंतु, दुसऱ्या जातीचा द्वेष करत नव्हते. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दुसऱ्या जातींबद्दलचा द्वेष सुरू झाला. मी जात पाहून पुस्तकं वाचत नाही."
शरद पवारांना हिंदू नावाची अॅलर्जी आहे असा आरोप करत त्यांनी जनतेला विष का पाजलं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. "मी कोणतीही जात मानत नाही. शरद पवार यांनी अठरा पगड जातींमध्ये विष कालवले. हे विष आता शाळा- कॉलेजांमध्ये पोहचले आहे. उदात्त विचार देणारा महाराष्ट्र जातींमध्ये सडत आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
जेम्स लेनसारखा माणून उभा करून शरद पवार यांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला, असा गंभीर आरोप देखील राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर यावेळी केला आहे. "शरद पवार यांनी जेन्स लेनवरून दहा ते पंधरा वर्षे राजकारण केले. त्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला तर मग तुमची केंद्रात सत्ता होती, त्यावेळी तुम्ही त्याला का फरफटत आणले नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणातून पुढच्या पिढीने काय घ्यावे?
महाराष्ट्रातील नेते रोज वाटेल ते बोलत आहेत. पुढच्या पिढ्या या राज्याकडे पाहताना कशा पाहतील? पुढच्या पिढ्या यांच्याकडून काय शिकतील? महाराष्ट्र आज रोज खड्यात जात आहे. सर्वात जास्त समाजसुधारक महाराष्ट्राने दिले आहेत. परंतु, आपण त्यांच्याकडून काय बोध घेत आहोत? आज राज्यात कोणीच मुद्द्याचं बोलायला तयार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या