Maharashtra Breaking News 2 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Aug 2022 06:47 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जाहीर सभा घेऊन शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले.  यावेळी यावेळी भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला. 


जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. यावेळी मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच खंडोबाचा खंडा देखील एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बरणेंनी उचलला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत विजय शिवतारे, शिवाजी आढळराव पाटील, तानाजी सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते.

Nagpur Roads : कोतवाली चौक ते गंगाबाई घाट रोडपर्यंत वाहतूक प्रतिबंधित, मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर : सीमेंट रोड बांधकामाकरिता कोतवाली चौक ते गंगाबाई घाट सी.सी. रोडपर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा दोन, पॅकेज 15 अंतर्गत कोतवाली चौक ते झेंडा चौक व माणिपूरा चौक ते गंगाबाई घाट सी. सी. रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस दोन्ही बाजुकडील मार्ग बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक झेंडा चौक ते सक्करदरा मार्गाने दोन्ही बाजूने जाईल तसेच इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

Nagpur Covid Update : दिवसभरात 267 रुग्णांची कोरोनावर मात, सक्रिय बाधितसंख्या 1510वर

नागपूरः जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त अहवालानुसार 267 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 212 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1510 कोरोनाबाधित सक्रिय आहेत. दिवसभरात 2130 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. सध्या 66 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1444 बाधित गृहविलगीकरणात आहेत. 

शंभूराज देसाई यांच्या मतदान संघात आदित्य ठाकरे यांची सभा

शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदान संघात आदित्य ठाकरे यांची सभा सुरू आहे.  आदित्य ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. "दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ सुरू असून हे सरकार गद्दारांचे सरकार आहे, ते कोसळणार आहे.  इथं आल्यानंतर इथली गर्दी पाहिल्यानंतर माझं दुःख कमी झालं, अशा भावना आदित्या यांनी व्यक्त केल्या. 

मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांनाच देण्यात येणार, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Mumbai News : मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांनाच देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री पुन्हा एकदा समोर आली आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचा शासकीय परिपत्रक काढलं.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; शिंदे गटाच्या खासदारांचे अमित शहांना निवेदन

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी शिंदे गटाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले आहे.  

शिंदे गटाचे खासदार थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

वनविभागाच्या आडमुठेपणामुळे वाशिमच्या भुली गावातील नागरिक त्रस्त, रस्ता आणि स्मशानभूमीची कामं अडवली

Washim News : वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली गावातील नागरिक सध्या वनविभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे त्रस्त आहेत. गावातील नागरिकांना दुसऱ्या गावात जाण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम थांबलं आहे. तर गेल्या कितीतरी दशकांपासून गावालगत असलेल्या स्मशानभूमीची जागा वन विभागाच्या मालकीची असल्याचं सांगत स्मशानभूमीचा विकास थांबवला आहे. त्यामुळे गावातील नागरिक वनविभागाच्या हुकुमशाहीला त्रासून गेले आहेत. या आडमुठेपणामुळे भुली गावातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. मृत्यूनंतरही गावात हक्काची जागा मिळत नाही. स्मशानभूमीवर वन विभागाने आपला अधिकार असल्याचे सांगितला आहे. तर सरकारदरबारी ग्रामपंचायतीमध्ये जागेची सात बारावर स्मशानभूमीची नोंद आहे. मात्र जागा आणि रस्ता मिळावा याकरता जिल्हा परिषद सदस्या सुरेखा अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पर्यायी परिस्थितीवर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. वन विभागाच्या हुकूमशाहीला गाव कंटाळलं आहे. उद्रेक होणार, मार्ग काढा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही या पत्रातून दिला आहे.

पनवेल, उरणमध्ये मनसेला धक्का, माजी जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात दाखल

Panvel News : पनवेल आणि उरण तालुक्यात मनसेला मोठा धक्का बसला असून येथील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. मनसेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यामध्ये मनसेचे उपशहरप्रमुख, शाखाध्यक्ष, कामगार सेनेमधील पदाधिकारी अशा 100 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर मनसेमधील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत बंडाळीला कंटाळून या कार्यकर्त्यांनी मनसेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घेणार. पहाणी दरम्यान शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी नुकसानी बाबत संवाद साधला. 

Yavatmal News : यवतमाळ काँग्रेसचे 5 ऑगस्टला जेलभरो आंदोलन

Yavatmal News : देशात वाढती महागाई, बेरोजगारी यासह संकटग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेस येत्या पाच ऑगस्टला कायदे तोडून, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेती पिके पूर्णतः पाण्यात बुडाल्याने प्रचंड स्वरूपाचे नुकसान झाले असतानाही राज्य शासनाने अद्यापही पंचनामे पूर्ण केले नाहीत, त्यामुळे ताबडतोब मदतीची आवश्यकता असलेला शेतकरी नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला  आहे. अशा संकट समयी महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, दुग्धजन्य पदार्थांवर देखील आता जीएसटीचा भार लावण्यात आला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत, अशा गंभीर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस आता आक्रमक आंदोलन करणार आहे. प्रत्येक तालुका ठिकाणी होणाऱ्या काँग्रेसच्या या जेलभरो आंदोलनात काँग्रेसचे आक्रमक स्वरूप देखील बघायला मिळेल असा इशारा माणिकराव ठाकरे यांनी दिला.

सायन-पनवेल हायवेवर शिवशाही बसचा मध्यरात्री अपघात, सर्व प्रवासी सुखरुप

Navi Mumbai News : साताऱ्यावरुन बोरिवलीला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा मध्यरात्री कामोठे इथे अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन बस कामोठे येथे पोहोचली असता टेम्पोला बस धडकली. टेम्पो चालकाने चुकीचा टर्न मारल्याने बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघात झाला. यात बसच्या पुढील काचा फुटल्या. यावेळी बसमध्ये 14 प्रवासी होते. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान साधल्याने मोठा अपघात टळला. बस ड्रायव्हर किरकोळ झाला असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी मंडळाच्या बसने मुंबईत सोडण्यात आले.

कोकणातील रिफायनरी विरोधक 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान राजापूर पोलीस स्टेशनच्या आवारात साखळी उपोषण करणार
Ratnagiri News : कोकणातील रिफायनरी विरोधक 10 ते 14 ऑगस्ट या दरम्यान साखळी उपोषण करणार आहेत. रिफायनरीविरोधी आंदोलक ग्रामस्थांवर चुकीची कलमं लावत त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, असा आंदोलकांचा दावा असून त्याविरोधात राजापूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात साखळी उपोषण केले जाणार आहे. याबाबतचे एक पत्र विभागीय अधिकारी राजापूर यांना देण्यात आले आहे. यामध्ये धोपेश्वर, गोवळ, सोलगाव, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, राजवाडी, वाडा तिवरे, साखरी नाटे, नाटे, अंबोळगड आणि धाऊलवल्ली या गावचे ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. रिफायनरेशन ड्रोन आणि माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला होता. त्याविरोधात मोठे जण आंदोलन देखील उभे राहिले. या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी चुकीची कलमं लावली आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे. त्याविरोधात हे साखळी उपोषण केले जाणार आहे.
सांगलीत नागपंचमीच्या पूर्वसंध्येला बेकायदेशीररीत्या नाग बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, तीन नाग जप्त

Sangli News : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला अवैधरित्या तीन नाग पकडून ताब्यात ठेवल्याप्रकरणी वनविभागाने दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील हे तरुण असून विशाल अशोक पवार (वय २९ वर्षे) आणि हर्षद प्रकाश वडार असे या दोन तरुणांची नावे आहे. त्यांच्याकडील तीन नाग जप्त केले आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित विशाल पवार आणि संशयित हर्षद वडार या दोन तरुणांनी कुरळप येथील परीट मळामधील शुभम परीट यांच्या शेतातील वापरात नसलेल्या घरामध्ये तीन नाग लपवून ठेवले होते. सांगली उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पल्लवी चव्हाण, वनपाल सुरेश चरापले वनरक्षक अमोल साठे प्रकाश पाटील, श्रीमती रायना पाटोळे, सुनील पवार व सर्पमित्र अमित कुंभार यांनी धाड टाकून तीन नाग ताब्यात घेतले. संशयित विशाल अशोक पवार आणि हर्षद प्रकाश वडार यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

सांगलीत नागपंचमीच्या पूर्वसंध्येला बेकायदेशीररीत्या नाग बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, तीन नाग जप्त

Sangli News : नागपंचमीच्या पूर्वसंध्येला अवैधरित्या तीन नाग पकडून ताब्यात ठेवल्याप्रकरणी वनविभागाने दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील हे तरुण असून विशाल अशोक पवार (वय २९ वर्षे) आणि हर्षद प्रकाश वडार असे या दोन तरुणांची नावे आहे. त्यांच्याकडील तीन नाग जप्त केले आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित विशाल पवार आणि संशयित हर्षद वडार या दोन तरुणांनी कुरळप येथील परीट मळामधील शुभम परीट यांच्या शेतातील वापरात नसलेल्या घरामध्ये तीन नाग लपवून ठेवले होते. सांगली उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पल्लवी चव्हाण, वनपाल सुरेश चरापले वनरक्षक अमोल साठे प्रकाश पाटील, श्रीमती रायना पाटोळे, सुनील पवार व सर्पमित्र अमित कुंभार यांनी धाड टाकून तीन नाग ताब्यात घेतले. संशयित विशाल अशोक पवार आणि हर्षद प्रकाश वडार यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

Nag Panchami 2022 : आज नागपंचमी

Nag Panchami 2022 : आज नगपंचमी आहेय  हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते.   पहाटे 05:13 वाजेपासून सुरू होणार आहे. नागपंचमी तिथी समाप्ती 3 ऑगस्ट रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत नाग पंचमीच्या पूजेची मुहूर्त आहे. या वर्षी नागपंचमीला दोन विशेष योगही तयार होत आहेत.

महागाईच्या मुद्यावर राज्यसभेत चर्चा

राज्यसभेत इंधन दरवाढ, महागाई, जीएसटी, अग्निपथ योजना आदी मुद्दय़ांवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. 

Aarey Car Shed : सुप्रीम कोर्टात आज आरे मेट्रो कारशेड प्रकरणावर सुनावणीची शक्यता

Aarey Car Shed : मुंबईतील गोरेगाव आरेत सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेत आणि आरे कारशेडमध्ये झाडे कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. आज या प्रकरणावर सुनावणीची शक्यता आहे. 

Sanjay Raut ED Enquiry : संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार

Sanjay Raut ED Enquiry : पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी  8:30 ते 9:30 दरम्यान संजय राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात आले.  9.30 नंतर ईडी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार आहेत.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


संजय राऊत यांची  ईडी चौकशी करणार


पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी  8:30 ते 9:30 दरम्यान संजय राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात आले.  9.30 नंतर ईडी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार आहेत.  


सुप्रीम कोर्टात  आज या प्रकरणावर सुनावणीची शक्यता


मुंबईतील गोरेगाव आरेत सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेत आणि आरे कारशेडमध्ये झाडे कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. आज या प्रकरणावर सुनावणीची शक्यता आहे.


महागाईच्या मुद्यावर राज्यसभेत चर्चा


राज्यसभेत इंधन दरवाढ, महागाई, जीएसटी, अग्निपथ योजना आदी मुद्दय़ांवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. 


आज नागपंचमी 


आज नगपंचमी आहेय  हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. पहाटे 05:13 वाजेपासून सुरू होणार आहे. नागपंचमी तिथी समाप्ती 3 ऑगस्ट रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत नाग पंचमीच्या पूजेची मुहूर्त आहे. या वर्षी नागपंचमीला दोन विशेष योगही तयार होत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.