मुंबई : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची (Soyabin) खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्यामुळे, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना (Farmers) पुढील 6 दिवस आपले सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावर देता येणार आहे.
सोयाबीन मुदतवाढीसंदर्भात पुढे बोलताना मंत्री रावल म्हणाले की, राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती,ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता.आज ती मुदतवाढ मिळाली. या मुदतवाढीमुळे राज्याला दिलेल्या 14,13,269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्याला पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टना पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे. 6 फेब्रुवारी पर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 मुदत वाढ दिली, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्र सरकारचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.
सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल
देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी झाली आहे. देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने (Maharashtra) केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलीहोती. अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्याची माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती.