Maharashtra Breaking News Live Updates 18 September 2022 : नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2022 11:52 PM
सिंहगडावरील हत्तीटाक्यात बुडून सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सिंहगडावरील हत्ती टाक्यात सहलीसाठी आलेला इयत्ता बारावीचा विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहिद मुल्ला असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता. 

Raj Thackeray : नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जे काही करतात ते 'वरुन'च करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

Nitin Gadkari : फुटाळा तलावावर लोटस गार्डन बनवणार: नितीन गडकरी

नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असून त्यासाठी कमळाच्या साडेसहाशे जाती गोळा करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. 

Nagpur : सिव्हिल लाइन परिसरात मनपाच्या 'आपली बस'ची दुचाकीला धडक

नागपूरः रविवारी ड्यूटीवर जात असलेल्या महिला कॉन्स्टेबलला नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस'ने सिव्हिल लाइन परिसरातील बाटा शोरुम समोर धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर याच बसमधून महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही आयोग स्थापन करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही आयोग स्थापन करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक पार पडली. 

अमरावती : आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उदघाटन
दिव्यांग बांधवांना सर्व सेवा आणि सुविधा एकाच ठिकाणी प्राप्त व्हाव्या या उद्देशाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उदघाटन आज करण्यात आले. देशभरात विविध राज्यांमध्ये एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने या केंद्राचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांच्याहस्ते पार पडले. अमरावती येथील अपंग जीवन विकास संस्थेच्या आवारात या नवीन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अमरावतीच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना विविध प्रकारची उपकरणे, रोजगार विषयक मार्गदर्शन, कृत्रिम अवयव या सारख्या महत्वाच्या गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात हा या केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
नागपूर : उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा, एका आठवड्यात पाच जणांचा मृत्यू

नागपूरचे उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत का??? कारण नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या उड्डाणपूलांवर एका आठवड्यात झालेल्या दोन घटनांमध्ये उड्डाणपूलांवरून खाली कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. अशाच एका अपघातात संपूर्ण कुटुंब गमावणाऱ्या किरण खापेकर ने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर आणि त्याकडे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, आता तरी किमान कारवाई करा, शहरातले उड्डाणपूल सुरक्षित बनवा अशी मागणी केली आहे...

यवतमाळ : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला 10 हजार कार्यकर्ते जाणार

मुंबईतील शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला यवतमाळ जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. या संदर्भात मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. 200 बसेस द्वारे शिंदे गटातील शिवसैनिक मुंबईत मेळाव्याला जाणार आहेत. यवतमाळ येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे गटनेते भरत गोगावले, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थिततीत 28 सप्टेंबरला हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्राचे आयोजन करण्यात येणार आहे. 

यवतमाळ : धानोरा गावात डायरियाची लागण

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील धानोरा येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेचा वॉल लीकेज झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावात डायरियाने थैमान घातले असून आता 15 ते 20 लोकांची प्रकृती बिघडली. या लोकांना उलट्या मळमळ आणि हगवण लागली. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील नागरिकांना डायरियाची लागण झाल्यानंतर काही लोकांना विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊ उपचार घेतला. शिवाय आता आरोग्य विभागाने ही या भागात शिबिर सुरू केले.

रायगड : माणगाव येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

माणगाव येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी माणगाव येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. मुलगी सापडल्यानंतर महिला दक्षता समितीमार्फत अल्पवयीन मुलीची विचारपूस करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी फरार असून माणगाव पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

खेड : 'आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय', रामदास कदम यांची टीका

शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम  दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा "चिपळूणचा नाच्या" असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली. 


 

नेरूळ : अखिल भारतीय योग निवड चाचणी स्पर्धा संपन्न

वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच विद्यापीठात योग प्रकारचा समावेश करण्यात आला होता. नेरूळच्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात अखिल भारतीय योग निवड चाचणी स्पर्धा 16 आणि 17 सप्टेंबर पार पाडली. आलेल्या स्पर्धकांमधून अखिल भारतीय स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघामध्ये उत्कृष्ट असे स्पर्धक निवडण्यात आले. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील 4 पंचांची नेमणूक करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र मधून वेगवेगळ्या महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते. एमबीबीएस डेंटल फिजिओथेरपी नर्सिंग आयुर्वेद होमिओपॅथिक इत्यादी एकूण दीडशे स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले होते. यामधून 12 मुले आणि बारा मुली यांची निवड अखिल भारतीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

अंबरनाथ : गणेशोत्वात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची दुरावस्था
अंबरनाथ येथील शिवगंगा नगर जवळील असलेल्या गोविंद पुलावर प्रचंड खड्डे पडले आहेत. गणेशोत्वाच्या काळात अंबरनाथ पालिकेने या रस्त्याची डांबरीकरण करत दुरुस्ती केली होती. मात्र गेल्या पाच ते सात दिवसात या रस्त्याची अवस्था एकदम बिकट झाली आहे. या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत, त्यामुळे येथील मनसे कार्यकर्ते अविनाश सुरसे यांनी पालिकेच्या विरोधात गोविंद पुलावर बॅनरबाजी केली, या बॅनर वरती अंबरनाथ नगरपालिकेचे नाव रस्ते बनवण्या बाबत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे, अंबरनाथ शहरात मध्यंतरीच्या काळात अनेक रस्ते असेच बनवण्यात आले होते, मात्र त्यांची अवस्था चार ते पाच दिवसात खराब झाली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इजिप्त दौऱ्यावर 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज तीन दिवसाच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दोन्ही देशाच्या संरक्षण संबधावर संबधित मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.

नालासोपाऱ्यातून एका नक्षलवाद्याला अटक, आरोपीची चौकशी सुरु

आज पहाटे दहशतवाद विरोधी पथक, ठाणे युनिटच्या पथकाने धानवी, रामनगर नालासोपारा (पुर्व), (पालघर) येथील एका चाळीवर छापा टाकला. यामध्ये कारु हुलाश यादव (45 वर्षे) या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती मुळचा डोडगा, तालुका कटकमसांडी, जिल्हा हजारीबाग, झारखंड येथील रहिवाशी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटीचा सदस्य आहे. तो सन 2004 पासून नक्षली कारवाईमध्ये सक्रिय असून, त्याच्यावर सरकारनं 15 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. आरोपी कारू हुलाश यादव हा औषधोपचाराकरीता नालासोपारा येथे आलेला असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीताबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आलेली असून, सदर आरोपीची अधिक चौकशी सुरु आहे.


 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचं जन आक्रोश आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील नऱ्हे परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. नऱ्हेमधील कचरा प्रश्न, पाणीपुरवठा आणि रस्त्याची झालेली दुरावस्था विरोधात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आहे. पुणे महानगरपालिकेच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.

रायगड : जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर कारचा अपघात

जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर कारचा अपघात झाला आहे. चौकनजिक एनएमएमटी बसची कारला मागून धडक दिल्याने अपघात घडला. खोपोली येथील रहिवासी असणारे डॉ. सरदार हे या अपघातात जखमी झाला आहेत. त्यांना खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.

उल्हासनगर : एका इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये आज पुन्हा एका इमारतीचा भाग कोसळला. साई सदन या इमारतीच्या बाल्कनीतील स्लॅब जवळच्या घरावर कोसळला. सकाळी 8.15 च्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील ही घटना आहे. बाल्कनीचा स्लॅब खाली पडल्याने घरात झोपलेले पती-पत्नी गंभीर जखमी झाले. गोपाल गाबरा आणि बरखा गाबरा अशी त्यांची नावं आहेत. या अपघातात जखमी झालेल्या गोपाल गाबरा (61) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यवतमाळ : दोन दारुड्यांचा टॉवरवर चढून गोंधळ
यवतमाळच्या भोसा येथे आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवर वर चढल्याने गोंधळ उडाला त्यांनी केलेल्या विरुगीने साऱ्यांनाच वेठीस धरले. अनिकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी त्यांची नावे, दोघांनी दारूची नशा करण्यासाठी चक्क टॉवरवर बैठक मांडली. टॉवरवरून आरडाओरड  सुरू झाल्याने गर्दी जमा झाली. कुटुंब आरडाओरड करून रडायला लागले. त्यानंतर पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले आणि त्यांनी दारुड्यांना सुखरूप उतरविले. या संपूर्ण प्रकाराने महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. भोसा येथे अवैध दारू, गांजा विक्रीचे अनेक अड्डे झाल्यामुळे कर्त्या पुरुषांना, तरुण, शाळकरी मुलांना दारू, गांजाचे व्यसन जडले, परिणामी गुन्हेगारी वाढली, महिला मुलीना घराबाहेर पडणे अवघड झाले. पोलीस मात्र मागणी करूनही कारवाई करीत नसल्याने यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उस्मानाबाद : उद्या मराठा आरक्षण मोर्चा

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात उद्या निघणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. हा मोर्चा विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय असा निघेल. या मोर्चात एक ते दीड लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज आयोजकांचा आहे. पोलीस प्रशासनाकडून पोलिसांनी आरक्षण मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त केला आहे. 

अकोला : जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जयमय

अकोल्यात गेल्या दोन तासांत झालेल्या जोरदार पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी शिरलंय. या पावसामुळे अनेक रस्ते जयमय झालेयेत.शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रूप आलंय. अनेक वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागलीय. अनेकांचे वाहने रस्त्यात पाण्यामुळ बंद पडल्याने अडकून पडले होते. अनेक ठिकाणी यामुळे वाहतुकीची कोंडी झालीय. पाऊस बंद झाल्याच्या 15 तासांनंतरही अनेक घरांत पाणी साचलेलं आहे. 

चंद्रपूर : म्हशीनं दिला पांढऱ्या शुभ्र पिलाला जन्म
चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गावातील एका म्हशीने चक्क पांढ-या शुभ्र पिलाला जन्म दिलाय. या पिलाला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. या पिलाची प्रकृती उत्तम आहे. मात्र आज सकाळपासून हे पांढरे पिलू दूध पित नसल्याने म्हशीचे मालक संजय येलमुले आणि त्यांचे कुटूंबिय चिंताग्रस्त आहेत. म्हशीचे हे पांढरे शुभ्र पिलू लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सातारा : हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार संपन्न, प्रल्हाद घनवट ठरले विजेते

देशातील तीन क्रमांकांमधील सर्वात खडतर आणि अवघड समजली जाणारी हाफ मॅरेथॉन म्हणजे सातारा जिल्ह्यातील समजली जाते. जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा असलेल्या कासरोडवरील घाट माथ्यापर्यंत असलेला हा ट्रॅक राज्यभरातील आणि देशभरातील क्रिडाप्रेमींसाठी आकर्षीत करणारा असतो आणि याच ट्रॅकवरची सातारा हिल हाफ मॅरेथॉनची स्पर्धा आज पार पडली. कोरोनामुळे दोनवर्ष बंद असलेल्या या स्पर्धेला आज उजाळा मिळाला. राज्यभरातून सुमारे 750 पेक्षा जस्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत अबालवृध्दांचाही समावेश होता. हा ट्रॅक 2 तास 9 मिनिटांत पार करणारे प्रल्हाद घनवट हे या स्पर्धेचे पहिले मानकरी ठरले. विशेष म्हणजे गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत हा ट्रॅक पूर्ण करमारा हा पहिला धावपटू असून त्याने या आगोदरच्या सर्व स्पर्धकांचे रेकॉर्ड तोडले आहे.

यवतमाळ : सावर गावात डेंग्यूचे पाच रुग्ण
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सावर गावात साथरोगांनी कहर केला असून डेंग्यूचे पाच रुग्ण आढळले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके, तुंबलेल्या नाल्या, घाण व अस्वच्छतेमुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे जलजन्य आजारही वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवून आरोग्य विभागाने देखील उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चंद्रपूर : सात दिवसाच्या चिमुकलीला निर्दयी बापाने सोडलं रस्त्यावर
सात दिवसाच्या चिमुकलीला निर्दयी बापाने रस्त्यावर टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील ही घटना असून आरोपी बापाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 25 वर्षीय आरोपी कुमोद पौरकर हा शिरशी बेरेडी येथील रहिवासी असून विठ्ठलवाडा येथिल भाग्यश्री देवतळे हीच्या सोबत त्याचा विवाह झाला होता. या दोघांना सात दिवसापुर्वी मुलगी झाली आणि आरोपी शनिवारी मुलीला बघण्यासाठी सासरी आला होता. या दरम्यान पती-पत्नीत भांडण झालं आणि आरोपी सात दिवसाचा मुलीला घेऊन निघाला. सासरचे लोकं मुलीला परत घेण्यासाठी त्याचा मागे धावत असल्यामुळे त्याने भर रस्त्यात सात दिवसाच्या मुलीला टाकून पळ काढला. मात्र या प्रकारामुळे ७ दिवसांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात निगराणी साठी ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीसाठी नवीन जागा जवळपास निश्चित!
कोकणातील रिफायनरीसाठी नवीन जागा जवळपास निश्चित झाली आहे. राजापूर तालुक्यातील बारसु, धोपेश्वर, पन्हळे , गोवळ, नाटे, वाडा तिवरे आणि वाडा पन्हेरे गावातील जागेची मोठ्या प्रमाणात संमती आहे. आतापर्यंत 2900 एकर जागेची समंती पत्र मिळाल्याची माहिती आहे. 

रिफायनरीसाठी एकूण 5500 एकर जागेची आवश्यकता आहे. कोकणात 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारली जाणार आहे. वेदांता - फॉक्सकॉन गेल्यानंतर आता नव्या उद्योग मंत्र्यांकडून कोकणातील रिफायनरीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. थेट रिफायनरी विरोधकांशी संवाद साधत गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 
बीड : मित्रासोबत पोहायला गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू

माजलगाव धरणामध्ये मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका चाळीस वर्षीय डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माजलगाव मध्ये आज सकाळी घडली आहे. दत्ता फपाळ अस या डॉक्टराच नाव असून माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी त्यांचा दवाखाना आहे. सकाळी ते मित्रांसोबत माजलगाव धरनावर पोहोयला गेले, मात्र धरणामध्ये पाणी वाढल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक लोक आणि एनडीआरएफ च्या साह्याने त्यांचा धरणाच्या पाण्यात सुरू असून आता त्यांचा मृतदेह सापडलेला नाही.

मुंबई : कारशेड विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आरे येथे आंदोलन

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम कांजूरमार्ग येथील कारशेड चा निर्णय रद्द करून कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे पर्यावरण प्रेमी संघटना आक्रमक झाल्या असून मागील अडीच महिन्यापासून प्रत्येक रविवारी शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात आरे जंगलात आंदोलन करण्यात येत आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, निर्मला सावंत प्रभावळकर आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

बारामती : नीरा डावा कालव्यावरील पूल पाडण्यास सुरुवात, नागरिकांची गैरसोय

बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारा नीरा डावा कालव्यावरील पूल पाडण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. तीन हत्ती चौकातील कॅनॉल वरील पूल पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. शहरातुन भिगवण रोडकडे या पुलावरून गेल्यानंतर शाळा, महत्वाच्या बँका करीता करीता नागरिकांना हा पुल जवळचा होता. सदरचा पुल सुशोभित करण्यासाठी हा पाडला जात असून बारामतीच्या वैभवात भर पडण्याकरीता याचे काम प्रगतीपथावर केले जात आसल्याचे प्रशासनाने सांगीतलेय.

पालघर : देवेंद्र फडणवीसांकडून पुन्हा एकदा वाढवण बंदराची घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराची पुन्हा एकदा घोषणा केली असून यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या सदस्यांसोबत फोनवरून चर्चा केली. तसंच शिवसेना नेहमी स्थानिकांसोबत राहणार असल्याच आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर विरोधी लढा उभारणाऱ्या नारायण पाटील यांना दिलं. एका बाजूला महाराष्ट्राला हवे असलेले प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना नको असणारे प्रकल्प येथे लादले जात असल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या काही नेत्यांनी आज वाढवण गावात जाऊन येथील ग्रामस्थांची भेट घेतली. येथील ग्रामस्थ हे वाढवण बंदर विरोधात ठाम असल्याने उपनेते मिलिंद वैद्य आणि थेट ग्रामस्थांचे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा घडवून दिली. त्यानंतर 1998 साली सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता आणि त्यामुळे आता देखील शिवसेना पूर्ण ताकतीनिशी येथील स्थानिकांच्या पाठीशी उभी राहील अस आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

मुंबई : गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, आंदोलकांचा चाफेकर बंधू चौकात ठिय्या

गेल्या एक तासापासून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंदोलन करणारे शिवप्रेमी चाफेकर बंधू चौकात ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांची मागणी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथे बोलवावे त्यांना निवेदन द्यायचे आहे. मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीत त्यामुळे रस्त्यावरच सर्वजण बसले आहेत. आंदोलन वेगवेगळी शिव गीते गात आहेत. या आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन आंदोलन करण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत. मात्र आंदोलक ऐकायला तयार नाहीत. गड संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ही मुख्य मागणी या आंदोलकांची आहे.

पुणे : शरद पवारांच्या हस्ते वार्षिक साखर परिषदेचं उद्घाटन

आजपासून पुण्यात दोन दिवसांची वार्षिक साखर परिषद (Annual Sugar Conference) होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनतर्फे (The Deccan Sugar Technologists Association) ही वार्षिक परिषद होत आहे. या परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद : एक कोटीचा विदेशी मद्यसाठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

औरंगाबादच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा पकडला आहे. यावेळी विविध ब्रँडची विदेशी मद्याच्या 1 हजार 68 बॉक्ससह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण 1 कोटी 8 हजार 920  रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या अत्यंयात्रेला सुरुवात

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या अत्यंयात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी सकाळपासून त्यांच्या घरासमोर ठेवण्यातं आलं होतं. पोलीस दलाने मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे जुने सहकारी असलेले माजी मंत्री स्वरुपसिंग नाईकांना देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.


 

नागपूर : रवीभवन येथे मनसेची बैठक, राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

नागपुरात रवीभवन येथे मनसेची बैठक, राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर 





सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट, एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट 


एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 


स्पर्धेत धावणारा स्पर्धक मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील 


राज पटेल असे या स्पर्धकाचे नाव

मुंबई : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न

मुंबई : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, आंदोलक मंत्रालयाकडे रवाना

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, आंदोलक मंत्रालयाकडे रवाना

पुणे : अजित पवार येताच बालेवाडी क्रीडा संकुलातील बत्ती गुल

विरोधी पक्ष नेते अजित पवार भेटीला आले अन् बालेवाडी क्रीडा संकुलातील बत्ती गुल झाली. काही क्षणात साऊंड सिस्टम आणि फॅन सुरू झाले. पण दिवे काही पेटलेच नाहीत. काळोखातच कार्यक्रम सुरू झाला.

मुंबई : सीएसएमटी बाहेर आंदोलन, गडदुर्गांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी

शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ही मागणी घेऊन आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर आंदोलन केले जात आहे. आंदोलन सर्वजण चालत मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर आंदोलक चालत आझाद मैदान येथे पोहोचतील. त्या ठिकाणी या मागणीसाठी आंदोलन केले जाईल. सध्या सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या शंभर ते दीडशे जण जमा झाले आहेत.

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानावर परवानगी, उद्धव ठाकरे यांचा अर्ज फेटाळला

मुंबईचा वाहतूक कोंडीत जगात तिसरा क्रमांक

वाहतूक कोंडीमध्ये मुंबई जगात तिसरा क्रमांकांवर आहे. वाहतूक कोंडीत तुर्कीची राजधानी इस्तंबूल आणि कोलांबियाची राजधानी बोगोटाचा क्रमांक लागतो. त्यानंतर मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य मुंबईकराचे वर्षातील सुमारे 121 तास वाहतूक कोंडीत वाया जातात, असं एका अहवालात समोर आलं आहे. लंडनमधील ‘गो शॉर्टी’ या कंपनीने ही माहिती दिली आहे. वाहतूक कोंडीच्या यादीत भारतातील बंगळुरु आणि नवी दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. तर पुण्याचा 11 वा क्रमांक आहे.

मुंबई : लम्पी रोगामुळे मुंबईत जनावरांची ने-आण करण्यास बंदी

लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईत प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने-आण करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात विखे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे. 

मलकापूरमध्ये बंपर निघालेली बस धावताना दिसली, नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

मलकापूरच्या पत्रा तुटलेल्या बसनंतर गेवराईत बंपर निघालेली बस बिनधास्त रस्त्यावर धावताना पाहायला मिळाली. नादुरुस्त एसटी रस्त्यावर उतरून आणखी किती अपघात घडण्याची वाट एसटी बघत आहे ? दोन दिवसांपूर्वीच बुलढाण्याच्या मलकापूर येथे एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे अपघात होऊन दोन तरुणांचे हात कापल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर नादुरुस्त असलेल्या एसटी बस न तपासताच रस्त्यावर कश्या धावतात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलकापूरची ही घटना ताजी असतानाच इकडे बीड जिल्ह्यातल्या गेवराईत देखील अशीच एक एसटी बस पाहायला मिळाली. या बसच्या पाठीमागच बंपर अक्षरशः रोडवर घासत होतं. या तुटलेल्या बंपरमुळे किती मोठा अपघात होऊ शकतो हे या व्हिडीओतुन लक्षात येऊ शकतं.

पालघर : वैतरणा रेल्वे स्थानकावर आज सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर आज सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत मेगाब्लॉक आहे. मुंबईकडून डहाणूकडे जाणाऱ्या तीन तर डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. चार लोकल तर 2 लांब पल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. सकाळी 9 ते 12 वाजेदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील आठ गाड्या तीस मिनिटे उशिराने धावणार आहेत. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या विरार वलसाड शटल आणि सुरत विरार शटल या दोन लांब पल्यांच्या गाड्या पालघर पर्यत धावणार आहेत.

Coronavirus : देशात 5 हजार 664 नवीन कोरोना रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत भारतात 5 हजार 664 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 4  हजार 555 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

अमेरिकेसह पाकिस्तान इटलीत पुराचं थैमान, लाखो लोक बेघर

सध्या जगातील अनेक देशांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही देशांमध्ये पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच या पुरामुळं अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या जगातील अमेरिका, इटली, पाकिस्तान तसेच भारतातीत काही राज्यात पुरानं (Flood) थैमान घातलं आहे. या पावसामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बदलापूर : भावाच्या वाढदिवशीच लहान भावाचा मारहाणीत मृत्यू

बदलापुरात किरकोळ वाद एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने केलेल्या मारहाणीत दुसऱ्या तरुणाला वर्मी फटका बसल्यानं त्याचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे मोठ्या भावाच्या वाढदिवशीच लहान भावाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या पोद्दार कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या शिवम मोरे या तरुणाचा 15 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. त्यामुळं रात्री मित्रांसोबत पार्टी करून तो कात्रप परिसरात त्याच्या मित्राला सोडण्यासाठी जात असताना पुष्कर धुळे या त्याच्या मित्रासोबतच त्याचा वाद झाला. त्यामुळं शिवमने त्याचा लहान भाऊ शुभमला तिथे बोलावून घेतलं. यावेळी त्यांच्यात हाणामारी होऊन पुष्कर धुळे याने शुभम याच्या छातीत कोपर मारलं. मात्र हा फटका वर्मी बसल्यानं शुभम तिथेच खाली कोसळला. त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पुष्कर धुळे याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागपूर : राज ठाकरे हॉटेलकडे रवाना, आज नागपुरातून विदर्भ दौऱ्याला सुरुवात

नागपुरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रॅली

नागपूर : राज ठाकरे आजपासून पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर

Raj Thackeray Live Updates : नागपुरात राज ठाकरेच्या स्वागतासाठी बँड पथक

नागपुरात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत, राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर

नागपुरात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत.



राज ठाकरे नागपुरात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. राज ठाकरे आजपासून पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.

नागपूर रेल्वे स्थानकावर मनसैनिकांची गर्दी, आजपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

आजपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर मनसैनिकांची गर्दी झाली आहे.

मुंबई : जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते

बीकेसी जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करण्यात आले. या अकाऊंटवरून विद्यार्थी आणि सहकारी डॉक्टरांकडे पैसे मागितल्याचा प्रकार घडला आहे. डेरे यांनी सायन पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. आणि त्यांचे . 


शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने डेरे याबाबतची माहिती त्याांना दिली 


 आरोपीने  आपल्या जिटल वॉलेटचे तपशील अकाउंटवर  ठेवले होते आणि त्यात लोकांनी पैसे द्यावे असं म्हटलंय. 


सायन पोलीस डेरे यांनी दिलेल्या लेखी तक्रार तपासनी करून पुढे गुन्हा दाखल करणार. 


हे बनावट  खाते कोणी तयार केले याचा तपास पोलीस करत आहेत.


डाँ. ढेरे यांच्या नावाने बनावट खाते तयार करण्याची ही दुसरी वेळ आहे.

पुणे : कोंढव्यात भावानेच केला भावाचा खून

- पुण्यात कोंढव्यात भावानेच केला भावाचा खून


- मोठ्या भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू


- मोठा भाऊ आकाश भोसले यांनी केलेल्या मारहाणीत गळा आवळल्याने व ढकलून दिल्याने लहान भाऊ तेजस भोसले यांचा झाला मृत्यू


- कोंढवा पोलिसांत आईच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आकाश भोसले याला कोंढवा पोलिसांनी अटक केलीय


- भावाने भावाला का मारहाण केली आणि त्यात मृत्यू कसा झाला याचा तपास कोंढवा पोलीस करत आहेत

Godavari Flood : पैठणच मोक्षघाट आजपासून बंद; पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग वाढविण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून एक लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैठणचा मोक्ष घाटापर्यंत पुराचे पाणी पोहचले. आजपासून मोक्ष घाट नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. आजपासून पुढील आदेशापर्यंत दशक्रिया विधी बंद रहाणार आहे. पैठणच्या मोक्ष घाटावर सर्वसामान्यांना जाण्यासाठी बंदी असणार आहे. मोक्ष घाटाच्या भीतीला पुराचे पाणी जाऊन धडकले असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटाची मोर्चेबांधनी

आमदार रविंद्र फाटक यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन शिवसेना-भाजपा युतीचेच वर्चस्व या निवडणुकीत दिसुन येईल असा विश्वास वाडा येथे बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा, आमदार शांताराम मोरे,जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपाचे पालघर जिल्ह्यातील नेते बाबजी काठोळे, भाजप जिल्हाध्यक्ष नंदु पाटील, जि. प सदस्य प्रकाश निकम , मिताली बागुल, राजेश मुकणे,उपजिल्हाप्रमुख निलम संख्ये आणि शिवसैनिक उपस्थित होते. तर पालघर जिल्ह्यात सध्या शिंदे गट आणि शिवसेना असा चढाओढीचा सामना रंगायला सुरुवात झाली असून, शिंदे गटाची मदार आमदार रवींद्र फाटक यांच्यावर असली तरी त्यांचा फारसा प्रभाव पालघर जिल्ह्यात दिसून येत नसल्याचे चित्र आहे, तर शिवसेनेचे काही जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटा कडे जाणार असल्याची चर्चा आहे.

अकोला जिल्ह्यात तुफान पाऊस, अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

अकोला (Akola) जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. तसेच  विठ्ठलनगर भागातील अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. 

ठाणे : कारने स्ट्रीट पोलला धडक दिल्याने अपघात

ठाणे-घोडबंदर रोडवर मारूती सुझुकी कारने उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या स्ट्रीट पोलला धडक दिल्याने अपघात झाला. दोस्ती इम्पिरिया समोर हा अपघात झाला. चालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून कारचंही नुकसान झालं आहे. वाहन हायड्राच्या सहाय्याने बाजूला केले असून घोडबंदर रोड वाहतूकीसाठी मोकळा केला आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यावर पडलेला स्ट्रीट पोल उचलून रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आहे.

मुंबईसह अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी, आज विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

मुंबईसह राज्यात विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. तसेच  विठ्ठलनगर भागातील अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर, जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जळगाव : साखर कारखाने लवकरच होणार सुरू, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेले सहकारी साखर कारखाने लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पालघर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाणे, नाशिककडे घ्यावी लागणार धाव

13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किमान दहा हजार इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज असून ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवाराला जिल्ह्यातील शहरी भागात तसेच ठाणे, नाशिक शहरांमध्ये धाव घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत फक्त नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 50 लाख रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे

आज मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक

Mega Block 18 September 2022 : आज रविवारी 18 सप्टेंबर रोजी मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉक नसल्याने दिलासा मिळणार आहे. लोकलचं वेळापत्रक तपासा.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान

राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. 

सातारा : हिलहाफ मॕरेथॉनला सुरुवात, पोलिस परेड ग्राऊंडवरून सुरुवात

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान - 
राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे.  अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नंदूरबार- जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. 


राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर -
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी विदर्भ एक्सप्रेस ने ते मुंबईवरून नागपूरला पोहोचतील. सकाळी आठ वाजता मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 पासून नागपूरच्या रवी भवन सर्किट हाऊस वर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.


अनुराग ठाकूर यांची पत्रकार परिषद -
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या लोकसभा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान ते धारावीत दलित आणि मागास समाजाच्या घरी जाऊन भोजन करतील. मागास आणि दलित समाजाला भाजप सोबत जोडण्याचा या निमित्ताने प्रयत्न राहणार आहे. दुपारी एक वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. 


भुपेंद्र यादव बुलढाणा दौऱ्यावर -
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा  मतदार संघात त्यांचे संघटनात्मक विविध कार्यक्रम आहेत. 18 सप्टेंबर रोजी खामगाव तर 19 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत. 


अरविंद सावंत अकोला दौऱ्यावर -
शिवसेना नेते, माजी केंद्रीयमंत्री, खासदार अरविंद सावंत सावंत एक दिवसाच्या अकोला दौऱ्यावर आहेत. अकोल्याचे संपर्कप्रमुख राहिलेल्या अरविंद सावंतांची शिवसेना नेतेपदावर नियुक्ती झाल्यानंतरचा हा पहिलाच अकोला दौरा आहे. आज दुपारी 1 वाजता ते बाळापूर तालूक्यातील वाडेगाव येथे दिव्यांगांना सायकल वाटप करतील. तर दुपारी 4 वाजता अकोला येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील. 


राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार -
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात विखे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे. 


काँग्रेसचा ओबीसी मेळावा -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसचा ओबीसी मेळावा होणार आहे. सकाळी 10 वाजता औरंगाबाद रोडवरील धनलक्ष्मी लॉन्सवर पार पडणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून यावेळी काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अहमदनगर दौऱ्यावर येत आहे...येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बैठका करणार आहेत.



24 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला आपल्या घरी परतणार 


भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हिराबाई निखारे ही महिला 1998 सालापासून घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर ही महिला अनेक वर्ष पैठण येथे बेवारसपणे फिरत होती त्यानंतर काही वर्ष ही महिला चोपडा तालुक्यातील वेली येथे देखील रहात होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही महिला काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धुळे शहरातील सावली वृद्धाश्रम येथे वास्तव्यास आली होती, मनोरुग्ण  असणाऱ्या या महिलेवर सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी उपचार केले, यानंतर या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, या महिलेला तिचे कुटुंबीय तसेच गावाचं नाव आठवू लागले, या महिलेने दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्हा पोलीस आणि भंडारा जिल्हा पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला, अखेर हा शोध घेण्यात पोलिसांना आणि सावली वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. या महिलेला दोन मुले असून ही दोन्ही मुले आज आपल्या आईला घेण्यासाठी वृद्धाश्रमात येणार आहेत. आज या महिलेला मुलांच्या स्वाधीन केले जाणार आहे. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीची माहेरून सासरी पाठवणी करतात, त्या पद्धतीने या महिलेला सन्मानपूर्वक निरोप दिला जाणार आहे.


10 हजार तरुण धावणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली भाजपकडून स्लम क्रॉस कंट्री मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दिल्लीमधील झोपडपट्टीतील दहा हजार तरुण यामध्ये धावणार आहेत. 


पीयूष गोयल सौदी अरेबियाला देणार भेट
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, 18-19 सप्टेंबर 2022 रोजी आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी सौदी अरेबियाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री राजपुत्र अब्दुल अझीझ बिन सलमान यांच्यासह पीयूष गोयल आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन समारंभाचे सह अध्यक्ष पद भूषवतील.  


राजनाथ सिंह इजिप्त दौऱ्यावर - 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज तीन दिवसाच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दोन्ही देशाच्या संरक्षण संबधावर संबधित मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.


परराष्ट्र मंत्री 11 दिवसाच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर-
परराष्ट्र मंत्री जयशंकर आजपासून 11 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते संयुक्त राष्ट्र महासभासह त्रिपक्षीय बैठकीत भाग घेणार आहेत. तसेच बायडन प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 


एकदिवसीय मालिका - 
भारतीय महिला संघ आजपासून इंग्लंड महिला संघाविरोधात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामी निवृत्त होणार आहे, तिला विजयी भेट देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.