Maharashtra Corona Lockdown : राज्यात कडक लॉकडाऊन अटळ? कोविड टास्क फोर्सची आज बैठक
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत नोंदवल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखं कडक पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही, असं मत कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलं. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत नोंदवल्याची माहिती मिळत आहे. अशातच आज कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवार किंवा मंगळवारी लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे.
आज राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सची मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्यात जर कडक निर्बंध लागू करायचे असतील, तर ते कसे लागू करता येतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. कडक निर्बंध लादले तरी ते जनतेच्या हितासाठीच असतील, त्यातून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्राय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
...अन्यथा 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर : मुख्य सचिवांचा इशारा
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.
काल (शनिवारी) राज्यात 55 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. त्यात शनिवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल (शनिवारी) राज्यात तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.18 % एवढे झाले आहे.
राज्यात काल 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.72% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबई महानगरपलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद आज झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लॉकडाऊनबाबत सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्या आणि 'राजकारण' न करण्याबाबत सहकाऱ्यांनाही समज द्या : देवेंद्र फडणवीस
- CM Uddhav Thackeray : राज्यात कडक लॉकडाऊन लागणारच? सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले महत्वाचे दहा मुद्दे
- महाराष्ट्रासाठी येत्या तीन दिवसात 1121 व्हेंटिलेटर येणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
and tablets