नागपूरात बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या खुराणाचा 'खास' तिवारी अद्यापही फरार; धंतोली, वरुडचे प्रकरण थंडबस्त्यात
Nagpur : महाठग खुराणाच्या घराच्या झडतीत उमेदवारांची नवी यादी मिळाली होती. या यादीवर केंद्र सचिवांची स्वाक्षरी करून नियुक्तीची यादी तयार करण्यात आली होती. खुराणाची संयुक्त चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
![नागपूरात बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या खुराणाचा 'खास' तिवारी अद्यापही फरार; धंतोली, वरुडचे प्रकरण थंडबस्त्यात Khurana who cheated the unemployed in Nagpur is still absconding नागपूरात बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या खुराणाचा 'खास' तिवारी अद्यापही फरार; धंतोली, वरुडचे प्रकरण थंडबस्त्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/ee70c42206fbf924095d111c24b695e11659791506_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Crime News : शंभरहून अधिक बेरोजगारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा महाठग राकेश खुराणा न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पोहोचला असला तरी त्याचा सर्वात खास, निकटवर्तीय राजेंद्र तिवारी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुराणाचे सर्व अवैध काम तिवारीच करीत होता. गत अनेक महिन्यांपासून त्याचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान पीडितांनी मागणी केली आहे की, खुराणावर पूर्वी दाखल गुन्ह्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी. खुराणाने अनेकांना लुबाडले आहे. महावितरणचे सहायक अभियंता मोहन गजभेही खुराणाच्या जाळ्यात अडकले होते. त्यांनी त्यांच्या मुलासह इतरही उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी खुराणाला मोठी रक्कम दिली होती.
...म्हणून दोघांच्या आत्महत्या
कोणालाही नोकरी मिळाली नाही नसल्याने गजभे यांच्यावर दबाव वाढला होता. सततची होणारी विचारणा आणि तणावामुळे गजभे यांनी वरुडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे गिट्टीखदान परिसरात राहणारे अमित कोवेही खुराणाच्या जाळ्यात अडकले. कोवेच्या माध्यमातूनही लोकांनी खुराणा, तिवारी आणि शिल्पा पालपर्थीला पैसे दिले होते. जेव्हा नोकरी मिळाली नाही तेव्हा उमेदवार दबाव टाकू लागले. अखेर कोवे यांनीही पंचशील चौकाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली.
पोलिसांकडून दिरंगाईचा पीडीतांचा आरोप...
दोन्ही प्रकरणात खुराणा आणि इतर आरोपींवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. धंतोली पोलिस ठाण्यात (Nagpur Police) नोंद प्रकरणामध्ये खुराणाला केवळ अटकपूर्व जामीन मिळाला आहे. धंतोली पोलिसांनी विचार केला तर त्याचा जामीन रद्द व्हावा म्हणून प्रयत्न करू शकतात. मात्र दोन्ही प्रकरण थंडबस्त्यात गेले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीडितांनी खुराणा आणि त्याच्या टोळीची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्याची मागणी केली आहे. सर्व प्रकरणांचा एकाच वेळी तपास व्हावा, अशी मागणी होत आहे.
सर्व तक्रारींवर एकत्र चौकशीची मागणी
केवळ केळवदमध्येच त्याच्याविरुद्ध 20 तक्रारी आहेत. काही लोकांनी वर्धामध्येही तक्रार केली आहे. यावरून खुराणा आणि त्याच्या टोळीने किती लोकांची फसवणूक केली आहे याचा अंदाज येतो. सुप्रीम कोर्टातून झटका लागल्यानंतरही खुराणा लोकांना फसवत होता. त्याच्या घराच्या झडतीत मिळालेल्या उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होते की, मागच्या महिन्यातच त्याने नवीन यादी तयार केली होती. या यादीवर केंद्र सचिवांची स्वाक्षरी करून नियुक्तीची यादी तयार करण्यात आली होती. खुराणाची संयुक्त चौकशी होणे आवश्यक आहे.
ही बातमी देखील वाचा...
Shyam Manav : ...अन्यथा, तुमचाही दाभोळकर करू; धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)