इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश नाही, जयंत पाटलांनी राज्यपालांना दिलं निवेदन
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. मात्र, उरुण इस्लामपूर शहराच्या नामांतरातून 'उरुण' हा शब्द वगळण्यात आला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली
Jayant Patil : सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. मात्र, उरुण इस्लामपूर शहराच्या नामांतरातून 'उरुण' हा शब्द वगळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात 'उरुण' शब्द वगळलेला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. तर सोळाव्या शतकांनतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहरांला "उरुण-इस्लामपूर" अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर "उरुणचे" अस्तित्वच नष्ट होईल.
' उरूण इस्लामपूर' शहराच्या नामांतरातून 'उरुण' शब्द वगळण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने आज मा.राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 17, 2025
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने… pic.twitter.com/ULyDCOPXuX
1 ऑगस्ट 2025 पासून साखळी उपोषण सुरु
' उरुण इस्लामपूर' शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नावाचा समावेश करुन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची उरुण वासियांची आग्रहाची मागणी आहे. त्यासाठी ते दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून साखळी उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी शासनाच्या विविध मंत्री महोदयांनी भेटी देवून आश्वासने दिली आहेत. परंतु, राज्य मंत्रीमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून उरुन वासियांच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेऊन उरुण वासियांची मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यपाल महोदयांनी याबाबत सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
राज्यामध्ये उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव सुद्धा बदलण्यात आलं आहे. इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. या संदर्भातील माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली होती. या बदलाचे अनेकांनी स्वागत केले होते. अनेकांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती.
महत्वाच्या बातम्या:























