अनगरमध्ये प्रसिद्धीसाठी ड्रामेबाजी, बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नाही, जयकुमार गोरेंचा उमेश पाटलांना टोला
अनगर येथे झालेला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ड्रामेबाजी होती असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांना लगावला.
Jayakumar Gore on Umesh patil : अनगर येथे झालेला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ड्रामेबाजी होती असा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh patil) यांना लगावला. ज्यांना अनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे असे दाखवायचे होते अशा बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नव्हती अशी टीकाही गोरे यांनी उमेश पाटलांवर केली.
वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय
विनाकारण अनगर मध्ये दहशत आहे असे वातावरण तयार करत तेथील नेतृत्वावर आरोप करण्याचा प्रकार झाला आहे. कोणालातरी फॉर्म भरु दिला जात नाही असे वातावरण तयार करून सोलापूर किंवा मोहोळमध्ये पोलीस बंदोबस्त मागण्यात आला. मात्र जिथे फॉर्म भरायचा होता तिथे व्यवस्थित पोलीस बंदोबस्त होता. जेव्हा ते फॉर्म भरायला गेले तेव्हा तिथे एकही माणूस नव्हता. सुखरूप फॉर्म भरुन परत आले फक्त वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
फक्त प्रसिद्धीसाठी केलेली ही ड्रामेबाजी
ज्यांना अनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे असे दाखवायचे होते अशा बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नव्हती असा टोला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना लगावला. यांना इथे निवडणूक लढवायचीच नव्हती किंवा त्यांची क्षमताच नव्हती फक्त प्रसिद्धीसाठी केलेली ही ड्रामेबाजी होती अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी समाचार घेतला. आज अनगरकर बोलले त्या वेळेला ते तुम्हाला खालच्या पातळीवरचे वाटले मात्र त्यांचे विरोधक उमेश पाटील यांनी त्यांच्यावर केलेली टीका कोणत्या पातळीवरची होती, यावरही चर्चा झाली पाहिजे असे सांगत सर्वांनीच राजकारणात व्यक्तिगत टीका टाळून आचारसंहिता पाळली पाहिजे असा सल्ला जयकुमार गोरे यांनी दिला.
मोहोळच्या दोन पाटलांचा वाद काय? (Mohol Rajan patil contraversy)
मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांचे नावं कायम चर्चेत राहते. राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी. निवडणूक कुठलीही ही असली तरी ह्या दोघा पाटलांचा वाद-प्रतिवाद कायम पाहायला मिळतो. ह्या नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील त्याला अपवाद ठरल्या नाहीत. अनगर पंचायत बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला छेद देण्यासाठी उमेश पाटलांनी गावातीलच असलेल्या उज्वला थिटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर केली.























