Breaking News LIVE : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले

Breaking News LIVE Updates, 29 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 May 2021 08:47 PM
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले, पारशेट्टी आणि तानवडे कुटुंबातील तीन मुली आणि एक मुलगा वाहून गेले, दुपारी 3.30 ते 4 च्या सुमाराची घटना, पोलीस प्रशासन, स्थानिक जीवरक्षक आणि मच्छिमार यांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू, अद्याप कोणतीही माहिती हाती नाही, सोलापुरातील धक्कादायक घटना

राज्यात आज 31,964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी,

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 31,964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी, 20,295 नवीन रुग्णांची नोंद, राज्याचा रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर #Maharashtra #corona



https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-may-29-2021-988510

सिंधुदुर्ग : तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग : तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी,


जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू,


जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू होता,


दुपार नंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी,

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद, बाबासाहेब आणि शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येउ शकत नाहीत? प्रकाश आंबेडकरांचा सवाल.. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भुमिका राजकीय नाही. भारतीय जनता पक्षाचा आरक्षणालाच विरोध आहे.

हिंगोलीच्या औंढा शहरासह तालुक्यात  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

हिंगोलीच्या औंढा शहरासह तालुक्यात  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये  वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय. तब्बल अर्धातासापेक्षा जास्त वेळ पाऊस आणि वारे असल्याने ज्या शेतकऱ्यांचा भुईमुग काढणीला आला आहे व काही शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा काढून वाळण्यासाठी घातल्या आहेत या शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. शिवाय अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

भिवंडीत शिवसेनेला मोठा धक्का

सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसच्या गोटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नावाचा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सेनेच्या पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाळ्या मामा हे आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. 

वैयक्तिक वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, वडिलांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालूक्यातील भांबेरी येथे वैयक्तिक वादातून वडील-मुलावर जिवघेणा हल्ला करण्यात आलाय. यात वडिलांचा जागीच  मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी झालाय. यात आणखी दोणजण जखमी झालेत. गंभीर अवस्थेतील मुलाला अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आलेय. देविदास भोजने असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर अजय भोजने असं जखमी मुलाचं नाव आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये भीमराव गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, प्रमिला भीमराव भोजने यांना अटक केली असून एक आरोपी राजू गणपत भोजने हा फरार आहेय. संपत्तीच्या वादातून आज सकाळी लोखंडी देविदास भोजने यांच्या कुटुंबियांवर हा हल्ला करण्यात आलाय. आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने भांबेरी परिसर हादरुन गेला आहे. गावात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

वादळी वाऱ्याचा साखर कारखान्याला मोठा फटका

परभणीत काल झालेल्या वादळी वारे आणि पावसाचा फटका शेतकऱ्यां बरोबरच साखर कारखान्याला ही बसलाय.परभणीतील आमडापुर शिवारातील लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्याची तब्बल 30 हजार क्विंटल साखर भिजली असुन या साखरेचा अक्षरश पाक झालाय तसेच कारखान्याचे पत्रे,परिसरातील विजेचे खांब,गोडाऊनचे शटर तुटले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने या परिसरातील 10 ते 12 गावच्या शेती बरोबर लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्याला ही मोठा आर्थिक फटका बसला


 

गडचिरोलीतील दारूबंदी उठली पाहिजे ही जनभावना- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यात यावी ही येथील जनतेची भावना असून आपण देखील याच मताचे आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. ते आज गडचिरोली दौऱ्यावर आले होते.


ते म्हणाले दारूबंदी करताना जे उद्देश्य ठेवण्यात आलेल्या ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तरी सुध्दा जिल्ह्यातील काही तथाकथित समाजसेवक स्वार्थापोटी दारूबंदी चे समर्थन करतात

पिंपरीत नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात नाकाबंदी सुरु असताना एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वराने फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत  हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस शंकर इंगळे हे जखमी झाले आहेत. काल रात्री पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असताना आरोपी संजय शेंडगेला पोलीस हवालदार शंकर इंगळे यांनी तपासणीसाठी थांबवून त्याच्याकडे परवाना, वाहनाची कागदपत्रे मागितली. त्यावेळी आरोपी संजय शेंडगे दुचाकी सुरु करुन पळून जाऊ लागला असता शंकर इंगळे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांचा हात आरोपीच्या दुचाकीला असलेल्या कॅरियरमध्ये अडकला. त्यांचा हात अडकला असतानाही आरोपी संजय शेडगेने 50 फूटपर्यंत शंकर इंगळे यांना फरफट नेत जखमी केले. या प्रकरणी संजय शेडगेवर वाकड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

कोणत्याही वर्गाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका: उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही वर्गाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे, जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती राज्य सरकार घेतंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या निकालावर अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस दिलीप भोसलेच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार सगळ्या जाती धर्मच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे, राजकारण न आणता न्याय मिळवून देणाऱ्यासोबत सरकार आहे असं अजित पवार म्हणाले. 

परिवहन मंत्री अनिल परब, RTO मधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार; पदोन्नती आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप

परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांन आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त याची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. खालच्या स्तरावर काय होते याला मंत्री जबाबदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच हे प्रकार चालूच राहणार, गुन्हा दाखल करायचा, नाहीतर कोर्टात जायचं हा जुना खेळ आहे. हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे, असंही भुजबळ महणाले.

वादळी वाऱ्याचा साखर कारखान्याला मोठा फटका, लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्याची 30 हजार क्विंटल साखर भिजली

परभणीत काल झालेल्या वादळी वारे आणि पावसाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्याला ही बसलाय. परभणीतील आमडापुर शिवारातील लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्याची तब्बल 30 हजार क्विंटल साखर भिजली असून या साखरेचा अक्षरश: पाक झालाय.  तसेच कारखान्याचे पत्रे, परिसरातील विजेचे खांब,गोडाऊनचे शटर तुटले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने या परिसरातील 10 ते 12 गावच्या शेती बरोबर लक्ष्मीनृसिंह साखर कारखान्याला ही मोठा आर्थिक फटका बसलाय

वादळी वाऱ्याचा परभणी तालुक्याला फटका

काल सायंकाळी परभणी तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे विजांच्या कडकडाटा सह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून परभणी तालुक्याला याचा जास्त फटका बसला आहे परभणी तालुक्यातील शिंगणापूर तरोडा अमडापूर लोहगाव या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर केळी आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली तर विजेचे खांब ही पडल्याने अनेक गावांमध्ये रात्रीपासून वीजही गायब झाली आहे

वादळी वाऱ्याचा परभणी तालुक्याला फटका, फळबागांचे मोठे नुकसान 

काल सायंकाळी परभणी तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून परभणी तालुक्याला याचा जास्त फटका बसला आहे. परभणी तालुक्यातील शिंगणापूर तरोडा अमडापूर लोहगाव या परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर केळी आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली तर विजेचे खांब ही पडल्याने अनेक गावांमध्ये रात्रीपासून वीजही गायब झाली आहे

देशातल्या लस तुटवड्यावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

देशातल्या लस तुटवड्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईत भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

लस तुडवड्यावरुन मुंबई काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन सुरु

आमच्या मुलांची लस विदेशात निर्यात का केली असा सवाल करत लस तुटवड्यावरुन मुंबई काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात : शिवसेना खासदार संजय राऊत

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात, खासदार संभाजीराजेंच्या भूमिकेसोबत आम्ही सगळे सहमत ; शिवसेना खासदार संजय राऊत 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची आज भेट

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती  व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षण विषयी आज संध्याकाळी चार वाजता पुणे येथील आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे. भारत देशातील सद्यस्थितीत असणारी आरक्षण प्रक्रिया राजर्षी शाहू महाराजांच्या संकल्पनेतील आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच आरक्षणाच्या संकल्पनेचा भारताच्या राज्यघटनेत सहभाग केला आहे. आज त्यांच्या वंशजांची मराठा आरक्षण विषयी भेट होत असल्याने भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.

सांगलीत पेट्रोलने शंभरी ओलांडली, आजचा दर 100.01 रुपये

सांगलीत प्रथमच 100 रुपयाच्या वरती पेट्रोलचे दर गेले असून  आजचा पेट्रोलचा दर हा 100.01 रुपये इतका आहे. 

पतीसोबतच्या भांडणातून रागाच्या भरात पत्नीनेच पोटच्या मुलांना दगडखाणीत फेकून स्वतःही उडी घेतली; दोन मुलांचा बुडून मृत्यू

नवरा बायकोच्या भांडणातून रागाच्या भरात आईनेच पोटच्या मुलांना दगडखाणीत फेकून दिलं आणि स्वतः देखील उडी घेतली. यात दोन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पतीने पत्नीला खाणीतून बाहेर काढलं. ही घटना बारामती तालुक्यातील पिंपळी गावात घडली. काल रात्री पत्नी अंजली आणि अतुल यांचं कडाक्याचे भांडण झालं आणि याच रागाच्या भरात पत्नीने आज पहाटे आपल्या पोटच्या मुलांना पिंपळी येथील दगडखाणीत दोन मुलांना फेकून दिलं आणि स्वतः उडी घेतली. यात बालकांचा बुडून मृत्यू झाला. दिव्या आणि शौर्य अशी मयत मुलांची नावे आहेत.

परभणीत मे महिन्यात 15 व्या वेळेस इंधन दरवाढ 

परभणी जिल्ह्यात आज पुन्हा इंधनाचे दर वाढले  असून पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. परभणीत पेट्रोलची किंमत 102. 57 रुपये असून डिझेलची किंमत 93.05 रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. 

वेळापूर पोलीस हल्ला प्रकरणी अवैध दारुवाल्यांचा शोध सुरु, दोन संशयित ताब्यात 

सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे काल रात्री अवैध दारू व्यवसायावर कारवाईला गेल्यावर पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस निरीक्षक खरतोडे यांच्यासह दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. आता त्या अवैध दारुवाल्यांचा शोध सुरु असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 

नांदेडमधील खासगी रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्याचा धुडगूस, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप

नांदेड शहरातील अपेक्षा या खाजगी रुग्णालयात हृदयविकाराचा धक्का बसल्याने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संबंधित महिलेचा नातेवाईक असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने डॉक्टर आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मध्यरात्री रुग्णालयात धुडगूस घातला. या दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोरवरील व्यक्तींनाही त्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिका सैरावैरा धावत सुटल्याचा आरोप अपेक्षा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दरम्यान रुग्णालयात गोंधळ घातल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी डॉ. संजय पतंगे यांच्या फिर्यादीवरुन पोलीस कर्मचारी असणारे श्रीराम जाधव यांच्यावर वाजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात, बापाने मुलाला गमावलं; मुंबईतील विक्रोळीतली घटना

मुंबईत भरधाव वेगात गाडी चालवताना गाडीवरील ताबा सुटल्याने एक बापाला आपला मुलगा गमवावा लागला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी गोदरेज गेट क्रमांक 1 जवळ काल रात्री अकराच्या सुमारास टेम्पो चालक प्रवीण शिंदे हे त्यांचा 17 वर्षांचा मुलगा जयेश आणि टेम्पोच्या मागे बसलेला कामगार राकेश यादव याच्यासह काही घरगुती साहित्य घेऊन घाटकोपरवरुन नाशिकला निघाले होते. मात्र पूर्व द्रुतगती मार्गावर गोदरेज गेट नंबर 1 च्या जवळ सिग्नल लागलेला असताना, तिथे उभ्या टँकरला हा भरधाव टेम्पो जाऊन धडकला. यात चालक प्रवीण आणि मागे बसलेला कामगार राकेश वाचले. मात्र टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेला जयेशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी विक्रोळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले होते. त्यांनी या तिघांनाही बाहेर काढून विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात उपचारांसाठी नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केलं. या अपघातामुळे सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. अखेर वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.

बीडच्या तवलवाडी गावात 60 संकरित गायी आणि 40 वासरांचा घटसर्पाने मृत्यू
बीडच्या आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये 60 संकरित गायी, 40 वासरे घटसर्प या आजाराने दगावल्याची घटना घडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाय आणि वासरे मृत्युमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे 70 ते 80 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एकाच गावात एवढी मोठी दुर्घटना झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून एकीकडे दुधाचे भाव घसरल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यात सुरु आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडे गायी असून दररोज जवळपास पाच हजार लिटर दूध संकलन या गावात केलं जातं. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अनेकांनी पसंत केला आहे. शिवाय शिक्षण घेऊनही नोकरी न लागत असल्यामुळे गावातील युवकवर्गाने मुक्त गायगोठा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवून स्वयंपूर्ण होण्याचा होण्यासाठी दूध धंदा अंगीकारला आहे. त्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घटसर्प आजाराने गायी दगावल्याची घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत गायींचे शवविच्छेदन करुन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प आसल्याचे निष्पन्न झालं आहे.
उल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी

उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. 

पार्श्वभूमी


उल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
उल्हासनगर येथील मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा एकदा उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख शुक्रवारी आणखी खाली, रिकव्हरी रेटही 93.24 टक्क्यांवर
राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात आज 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. 


राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता
कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.