Breaking News LIVE : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले
Breaking News LIVE Updates, 29 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Background
उल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
उल्हासनगर येथील मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा एकदा उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख शुक्रवारी आणखी खाली, रिकव्हरी रेटही 93.24 टक्क्यांवर
राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात आज 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता
कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात भीमा नदीच्या पात्रात चौघे बुडाले, पारशेट्टी आणि तानवडे कुटुंबातील तीन मुली आणि एक मुलगा वाहून गेले, दुपारी 3.30 ते 4 च्या सुमाराची घटना, पोलीस प्रशासन, स्थानिक जीवरक्षक आणि मच्छिमार यांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू, अद्याप कोणतीही माहिती हाती नाही, सोलापुरातील धक्कादायक घटना























