![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'मी शरद पवार, अजितदादांवर पीएचडी करतोय, संजय राऊतांवर पुस्तक लिहिणार' : चंद्रकांत पाटील
कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.
!['मी शरद पवार, अजितदादांवर पीएचडी करतोय, संजय राऊतांवर पुस्तक लिहिणार' : चंद्रकांत पाटील BJP Leader Chandrakant patil Allegation On Sanjay Raut on Maharashtra corona crisis 'मी शरद पवार, अजितदादांवर पीएचडी करतोय, संजय राऊतांवर पुस्तक लिहिणार' : चंद्रकांत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/19/fc28b3538a13b76c253b681273c545df_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशातील कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. मी शरद पवार आणि अजित दादांवर पीएचडी करतोय, आता संजय राऊतांवर पुस्तक लिहिणार आहे. ते मोठे नेते आहेत, ते मागणी करू शकतात, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
Coronavirus Pandemic in India : कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा; शिवसेनेची मागणी
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की,राज्यात कुठेही लसीचा तुटवडा नाही, केंद्रानं सगळ्यात जास्त लस ही महाराष्ट्राला दिली. मात्र महाराष्ट्रात लस वाया जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे केंद्रानं लस देताना कुठेही आडकाठी आणली नाही. मात्र राज्य सरकारला याचं नियोजन करता आलं नाही, त्यामुळे हे सगळे केंद्रावर खापर फोडणार आहेत. रेमडेसिवीर केंद्रानं द्यायचे, ऑक्सिजन केंद्राने द्यायचे, मग तुम्ही करायचं काय? हा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)