आता लग्नासाठी केवळ 15 व्यक्तींनाच परवानगी! राज्यातील 'या' जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात 9 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून 15 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. विशेष म्हणजे लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक करण्यात आले आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात 9 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून 15 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. विशेष म्हणजे लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक करण्यात आले आहे.
लग्नाला केवळ 15 व्यक्ती
सर्व स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्याचे आदेश आहेत. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, वाजंत्री पथक यांना परवानगी नाही. लग्नाला केवळ 15 व्यक्ती उपस्थित राहू शकतील व लग्नसोहळा 2 तासांत आटोपणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे लग्नसोहळा पार पडल्यास कारवाई होईल. ग्रामस्तरीय दक्षता समित्यांनी त्याबाबत देखरेख करावी. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याची असेल.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे आदेश आहेत. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान करता येईल.
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहील. *कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेलमध्ये स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. तिथे ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांची राहील.
हे राहणार संपूर्ण बंद
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण चालू राहील, मात्र त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.
कार्यालयेही बंद, ऑनलाईन कामे करण्याचे आदेश
सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील जसे की महसूल विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, महापालिका आदी. शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही.
Before You Go
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
महत्त्वाच्या बातम्या























