एक्स्प्लोर
'अरेला कारे' करण्याची हिंमत तिन्ही पक्षात, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात अजित पवारांचे वक्तव्य
महाविकास आघाडीच सरकार अनेक वर्षे टिकेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे. नवी मुंबईत महाविकास आघाडीचा पहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

मुंबई : वेगवेगळी विचारधारा असलेले पक्ष एकत्र आले आहे. सगळे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अर्थसंकल्प देशाचा सादर झाला, त्याच स्वागत झालं नाही. शेअर मार्केट पडलं, चार लाख कोटी बुडाले आहे. लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी काहीतरी वेगळं केलं जातं आहे. कोणाची मागणी नाही सीएए लागू केलं आहे. त्यातून अजून प्रश्न निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या कुणाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही. कोणी समर्थनार्थ तर कोणी विरोधात मोर्चे काढत आहे. त्यामुळे राज्यात वातावरण खराब होऊ नाही दिल पाहिजे, ही काळजी आपल्याला घेतली पाहिजे. यापूर्वी काही जणांची मक्तदारी होती. त्यांना घाबरायचं कारण नाही, ज्या गावची बाभळी असतात,त्या गावची बोरी असतात. तिघे एकत्र आल्यावर सोम्या गोम्याने गडबड करू नये कारण 'अरे ला कारे' करण्याची हिंमत तिन्ही पक्षात आहे. तिन्ही पक्षातील कोणीही कायदा हातात घेणार नाही याचा विश्वास आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. नवी मुंबईत महाविकास आघाडीचा पहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अजित पवार बोलत होते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे उपस्थित होते. कोणी रुसू नका, फुगू नका. आपल्याला येथील मक्तेदारी तोडून काढायची आहे. लोकांना सामावून घेता येतं. एकत्र काम करत असताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी धर्म कसा पाळावा, मित्र पक्षांशी कस वागावं हे सांगितल आहे. महाविकास आघाडीच सरकार अनेक वर्षे टिकेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे. चुकीच्या बातम्यांमुळे ध चा मा होतो. आपणही बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे. हलक्या कानाचे राहू नका. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न हे सरकार सोडवेल असा विश्वास अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. अनाधिकृत बांधकामांविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, इथून पुढे अनधिकृत बांधकाम करायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला सर्व सुविधा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आव्हान या सरकारपुढे आहे. शिवभोजन थाळी ही गरजू लोकांसाठी आहे. शिवभोजन केंद्रावर मी पाहतो ज्यांची जेवण घेण्याची परिस्थती आहे, ते लोकं पण शिवभोजन थाळी विकत घेतात. असे करू नका, ज्यांच्या खिशात पैसे नाही, त्या लोकांसाठी ही थाळी आहे. हे मी कार्यकर्त्यांना सांगतो कारण तो आमचा अधिकार आहे. नाहीतर माध्यम प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज म्हणून लावतील, अशी कोपरखळी देखील त्यांनी माध्यमांना दिली आहे. Navi Mumbai | महाविकास आघाडीचं मिशन नवी मुंबई, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सज्ज तिकीट वाटप करताना एकाला तिकीट मिळेल, दुसऱ्याला कुठेतरी समजून घ्याव लागेल. 111 उमेदवार ठरवताना कोण निवडून येईल हे तपसल जाईल. त्याला तिकीट मिळेल, पक्ष बघणार नाही. थोडं बेरजेचे राजकारण करायचं आहे. काही जणांना एकत्र घ्यायचं आहे. याला का घेतलं? तो कुठे होत,असलं सांगायचं नाही, मनात ठेवायचं नाही. कोणी मित्र पक्ष आले तरी काही गोष्टी कराव्या लागणार आहे. तानाजी मालुसरे कुटुंबातील लोक भेटले म्हणाले, चित्रपटात जे दाखवलं ते बरोबर नाही, मी त्यांना म्हंटल तो चित्रपट आहे. मागे सत्तेवर असताना त्यांनी प्रश्न सोडवले नाही, ह्यांच्यामुळे प्रश्न सुटले नाही. आता आपण प्रश्न सोडवणार आहोत. आता कोणीही महापौर होईल, पद मिळेल पण नाईक होणार नाही. लोक आम्हाला म्हणायचे काय सगळे नाईक दुसरं कोणी आहे की नाही? जाती जातीत विष कालवण्याचा काम केले जात आहे. देशाला संकटाच्या खाईत टाकण्याचे काम देशाला परवडणार नाही. आपले पणाची भावना मनात ठेवा, हलक्या कानाचे राहू नका. आपल्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न समोरचे करतील. अंतर पडतील, कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. महाराष्ट्रात अर्थसंकल्पात अन्याय झाला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तीन वेगळ्या पक्षाच, वेगळ्या विचाराचं सरकार येईल अस कुणाला वाटलं नव्हतं. 171 आमदारांचे मजबूत सरकार स्थापन झाले आहे. सरकार व्यवस्थित कारभार करत आहे. अवघ्या दोन महिन्यात या सरकारने क्रांतिकरी निर्णय घेतले आहे. उद्धव साहेब मंत्रालयात सकाळपासून,संध्याकाळपर्यंत काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर सामान्य माणूस मंत्रालयात येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नवी मुंबई महापालिका पहिली निवडणूक आहे. इतके कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी भरभरून दिलं पण त्यांनी स्वार्थ साधला नाही. जनता त्यांना धडा शिकवेल. कोणतीही पॉलिसी तुमच्यावर थोपणार नाही. चांगली पॉलिसी करू, कुणाला बेघर होऊ देणार नाही. आम्हाला कटकारस्थान, राजकारण करायचं नाही. जनतेची काम करायची आहे.परिवर्तन घडवण्याची संधी अली आहे. प्रत्येक वॉर्डात एकच तिकीट असते. तीन पक्ष एकत्र आले आहेत. नवी मुंबई विकास करायचा असेल,एकाधिकारशाही मोडून काढायचो असेल तर समजूतदार पणे वागावं लागणार आहे. ज्याला तिकीट देणार, त्याला आदेश समजून निवडून द्यायचे. इतर पद आहेत. सरकार असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळेल. चुकीचं काम केलं तर नको ते घडू शकत,हे लक्षात ठेवावे. स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाने एकत्र येऊन एकदिलाने काम केलं पाहिजे. महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवून आणायचं आहे. पैसे आहेत, सरकार आपलं आहे,अजित पवार पण आपल्याबरोबर आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. शशिकांत शिंदे म्हणाले, नवी मुंबईत महाविकास आघाडीचे सरकार आहे. एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. विधान सभेनंतर महाविकास आघाडीची पहिली निवडणूक आहे. आमचं ठरलं आहे निवडून यायचं ठरलं आहे. आमची लढाई आता नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणे यासाठी आहे. राष्ट्रवादीतून भापममध्ये गेलेले काही लोक येण्याच्या मनस्थितीत आहेत. रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकत्र लढणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























