![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती
पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का देत पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, हे प्रकरण शिवसेना पक्षप्रमुखांना रूचलेलं नसून पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे.
![पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती Ahmednagar parner Send back five Shiv Sena 5 corporators Uddhav Thackeray message to Ajit Pawar says sources पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप; सूत्रांची माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/20173301/uddhav-ajit.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशातच, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. परंतु, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे त्यांनी पक्षप्रवेश केला होता. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला. पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.
पाहा व्हिडीओ : अहमदनगर - पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठं खिंडार
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सरकारमध्ये सोबत सत्तेत असताना हा पक्षप्रवेश झाल्याने या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, याचा दोन्ही पक्षातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आलं होतं. 'सध्या राष्ट्रवादीत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. आता राष्ट्रवादीत प्रवेश केलेले 5 नगरसेवक हे आमदार लंके यांना माननारे होते. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अहमदनगरचे शिवसेनेच माजी आमदार अनिल राठोड यांनी मात्र यावर टीका करत ही पळवापळवी चुकीचे असल्याचं म्हटलं होतं.
पाहा व्हिडीओ : प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार : अंकुश काकडे
दरम्यान, आता स्वतः शिवसेना पक्ष प्रमुखांनी अजित पवारांना निरोप पाठवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणं हे त्यांनी फारसं रूचलेलं नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)