![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अतिवृष्टीमुळे नुकसान, नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील 60 वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिंतूर तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गालगतच्या पाचेगांव शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पूर्णतः हातून गेली. याच गावातील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.
![अतिवृष्टीमुळे नुकसान, नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील 60 वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या 60 year old farmer in the village visited by the leader committed suicide due to debt at parbhani अतिवृष्टीमुळे नुकसान, नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील 60 वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/13130606/Farmer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याला अडीच एकर शेती होती. या शेतीतील सोयाबीनचं नुकसान झालं होतं, शिवाय 35 हजारांचं कर्ज होतं. ते कसं फेडायचं या विवंचनेत गेले काही दिवस हा शेतकरी होता. शेवटी याच विवंचनेतून त्यांनी विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. महत्त्वाचं म्हणजे, या भागात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पीक नुकसानीची पाहणी केली होती.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिंतूर तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गालगतच्या पाचेगांव शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पूर्णतः हातून गेली. याच गावातील रामभाऊ बहिरट या 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने डोक्यावरील कर्जफेडीच्या विवंचनेत सोमवारी रात्री स्वतःच्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांनी त्यांच्या परिसरात एक दिवस शोध घेतला असता मंगळवारी सायंकाळी रामभाऊ यांचा मृतदेह त्यांच्या भावाला विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा धम्मपाल बहिरट याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामभाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
21 ऑक्टोबर रोजी फडणवीस आणि पंकजा मुंढेनी केली होती पाचेगाव येथील पीक नुकसानीची पाहणी
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या 21 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर होत्या. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील पीक नुकसानीची पाहणी करून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकार मधलं कोणीही बांधावर जात नाहीये, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र अद्यापही मदत जाहीर केलेली नाही, तात्काळ मदत जाहीर करा. अन्यथा आम्ही कोणालाही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. तर सरकारमधील मंत्री हे केवळ चॅनलवर बोलत आहेत. एवढं नुकसान होऊन अजूनही मदत जाहीर करण्यात आली नाही. हे आश्चर्यच आहे. आम्ही गप्प बसणार नाही आणि सरकारलाही गप्प बसू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही देवेंद्र फडणविस यांनी दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)