![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sumangalam Lokotsav : कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रीय शेती आवश्यक; गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मत
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
![Sumangalam Lokotsav : कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रीय शेती आवश्यक; गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मत Kolhapur Sumangalam Lokotsav Gujarat Governor Acharya Devvrat says Organic farming essential to prevent cancer outbreak Sumangalam Lokotsav : कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रीय शेती आवश्यक; गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/33c1c70bc729ba80fd38c0074e557a9e1677247013813444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sumangalam Lokotsav : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ‘सुमंगलम लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय शेतीपद्धती तसेच पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, प्राचीन काळी पंचतत्त्वांच्या संरक्षणाचे संस्कार प्रत्येकाला दिले जात होते. परंतु, सध्या आपल्या भौतिक सुखासाठी मानव पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. हे काम कोणत्याही जीवजंतूकडून होत नसून ते केवळ मानवाकडून होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापराने कॅन्सर सारख्या भयानक रोगांना सामोरे जावे लागत असून येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रीय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ शासकीय यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे.
पंचमहाभूतांचे संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या ठिकाणी राबवण्यात येत असलेले पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी प्रत्येक महिलेने खारीचा वाटा उचलावा
कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, संस्कार, परंपरा, अध्यात्म यावर भर असणारा भारत देश आहे. फॅशनचे युग, वैज्ञानिक युग, कलियुग म्हणून आपण आपली संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. दुध, दह्याला बाजूला सारुन चॉकलेट, पिझ्झाकडे वळत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्याला दुर्धर आजार आणि नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावे लागत आहेत. यावर केवळ पर्यावरण रक्षण हाच उपाय आहे. हे काम महिला शक्ती करु शकते. महिलांना गौरव, सन्मानाची वागणूक दिली तर समाजात निश्चित चांगला बदल घडतो. पर्यावरण रक्षणाचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला देवून पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा.
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, पूर्वी जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे पूजन आणि रक्षण केले जात असे. परंतु सध्या पंचतत्त्वांना हानी पोहोचवली जात असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. नीर, नारी आणि नदीला महत्व मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. प्रदीप मिश्रा, गोपाल उपाध्याय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश मार्गदर्शनातून दिला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम, सेंद्रीय शेती, पंचमहाभूत तत्वांची माहिती देणारी दालने, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आदींबाबत माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)