Kolhapur ZP Election : मतदान केलं आणि नंतर EVM मशिन जमिनीवर आपटून फोडून टाकलं; कोल्हापुरातील प्रकार
Bhudargad Nadhavade ZP Election : ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याकडून निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करत त्यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर त्याने ईव्हीएम फोडून टाकल्याची घटना घडली.

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी गोंधळाची घटना घडली. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमीन आपटून फोडून टाकलं. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जयवंत वायदंडे असं त्या व्यक्तीचं नाव असून ते शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकलं. या कृतीतून त्यांनी निवडणूक आयोगासह शासन आणि निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रियेवर आक्षेपार्ह पोस्ट
जयवंत वायदंडे यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मतदान केल्यानंतर जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम मशीन जमिनीवर जोरात आपटले.
अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जयवंत वायदंडे याच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 74. 35 टक्के इतकं मतदान झालं आहे. सोमवारी, 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
दोन गावांचा मतदानावर बहिष्कार
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणूकीच्या धामधूमीत दोन गावं अशी होती ज्या गावात आज एकही मत नोंदवलं गेलं नाही. तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. बलगवडे गावातील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी मोठी वृक्षतोड झाली. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. तर परभणीच्या बोथ गावाने रस्ता आणि नदीवरच्या पुलाच्या मागणीसाठी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गावातल्या गावकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले गेले जे अयशस्वी ठरले.
ही बातमी वाचा:
























